बेपत्ता व्यक्ती सुस्थितीत सापडणे कठीण झाले असल्याचे राज्यातील अलीकडच्या काही घटनांमुळे स्पष्ट झाले असून पोलीस बेफिकीर तर नाहीत ना, अशी शंका त्यामुळे निर्माण झाली आहे.  
पुण्यात दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका तरुणाचा मृतदेह येवत येथील कालव्यात सापडल्याची घटना अगदी ताजी आहे. कुणी बेपत्ता झाल्यास तशी नोंद पोलीस ठाण्यात करणे अत्यावश्यकच आहे. मात्र, अपवाद वगळल्यास बेपत्ता झालेली व्यक्ती सुस्थितीत सापडणे कठीण झाले असून त्यांचे मृतदेहच सापडले असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. गरिबी, तसेच विविध कारणांमुळे मुलगे अथवा तरुण घराबाहेर पडतात. कुणी आत्महत्या करतात, तर कुणी गुन्हेगारीत अडकतात. अनेकजण बेवारसपणे राहतात, असे आढळून आले आहे. राज्यात सर्वत्र अशीच परिस्थिती आहे.
nag06बेपत्तांचा शोध घेण्यास पोलीस बेफिकीर तर नाहीत ना, अशी शंका येणारा अनेकांचा अनुभव आहे. ‘कुठे गेला असेल, वाट पहा, शोधा, परत येईल’ असे सांगून टाळाटाळ केली जाते. दोन-चार दिवसांनी कशीबशी नोंद केल्यानंतर बेपत्ता व्यक्तींचे छायाचित्र व माहिती प्रसिद्धीसाठी पाठविले जाते. ही माहिती असलेल्या संकेतस्थळावर नोंद केली जाते. अल्पवयीन बेपत्ता असेल तर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. त्यापुढे कुठलीही हालचाल पोलिसांकरवी होत नाही, असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. अशा व्यक्तींचा चार महिन्यात शोध लागला नाही, तर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक युनिटला कळवावे लागते. त्यातही बेफिकिरी होत असल्याचे नागरिकांचे स्पष्ट मत आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक अथवा रस्त्यावर अनेक मुले अथवा महिला-पुरुष बेवारस फिरत असताना दिसतात.  या व्यक्ती त्यांच्या घरून बेपत्ताच असतात. यावरून पोलीस ठाण्यातील पोलीस बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत नसल्याचे नागरिकांना वाटते. महाराष्ट्र राज्यात २०११ ते २०१४ या काळात ५० हजार ९४७ मुले, तर १० हजाराहून अधिक मुली बेपत्ता झाल्याचे, तसेच देशात महाराष्ट्रात ते सर्वाधिक प्रमाण असल्याचे सांगितले जाते.
नागपूर शहरात २०१२ ते ३१ डिसेंबर २०१४ या काळात बेपत्ता झालेल्यांपैकी अद्यापही ६७ मुलगे, १७९ मुली, ६५४ पुरुष व ५६६ महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही. २०१४ मध्ये सर्वाधिक मुली (८४) जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, त्याखालोखाल ४० कळमना, गिट्टीखदान (३१), सर्वाधिक मुलगे (२४) गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, तर त्याखालोखाल नंदनवन १५, सर्वाधिक पुरुष (९२) जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, त्याखालोखाल ६७ गिट्टीखदान, तर ५२ एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेले आहेत. यांचा शोध न लागण्यामागे अपुरे मनुष्यबळ हे प्रमुख कारण सांगितले जाते. बेपत्ता व्यक्ती सापडल्यानंतर त्यासंबंधी पोलिसांना कळविले जात नाही. तरुण-तरुणी परस्पर लग्न करून राहतात. विशेषत: मुली अथवा महिला पळून जाऊनही लग्न करतात. त्याची माहिती मात्र पोलिसांना नसते.
मुंबईत पोलिसांचे मुबलक मनुष्यबळ आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात केवळ बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यास किमान दोन शिपाई असतात. राज्याच्या इतर भागात अशी स्थिती नाही. बंदोबस्त, गस्त व इतर गुन्ह्य़ांचा तपास असतोच. त्यामुळे बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रमाण कमी असल्याचे काही अधिकाऱ्यांनी बोलून दाखविले.

मनुष्यबळ अपुरे असले तरी अधिकारी ते शिपाई रोज एका पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतो. याशिवाय, प्रत्येक पोलीस ठाण्यात एक महिला व एक पुरुष, असे दोन बालसंरक्षण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत निरंतर समन्वय असतो. बेपत्ता व्यक्तीसंबंधीचे संकेतस्थळ हाताळण्याचे त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
    वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाजीराव पोवार,
    अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक युनिट