ठाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कारवाईमध्ये सुमारे ८ कोटी ५९ लाख ६१ हजारांचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधी सुपारी असा माल जप्त केला आहे. गुटखाबंदीला २० जुलै रोजी दोन र्वष पूर्ण होत असून यापुढेही वर्षभर ही गुटखाबंदी कायम राहाणार आहे. पुढील १९ जुलै २०१५ पर्यंत गुटख्यावरील कारवाई सुरू राहाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे कोकण विभाग सह.आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली.
ठाणे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने गेल्या दोन वर्षांमध्ये सुमारे दोन हजार ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. त्यातील सुमारे १३८ ठिकाणी गुटख्याचे साठे आढळून आले असून त्यातील १०५ जणांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असून ७९ प्रकरणांमध्ये उत्पादकांपर्यंत तपासणीसाठी पोलिसांकडे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या ८ कोटी ५९ लाख ६१ हजारांच्या मालापैकी साडेपाच कोटींचा माल देवनार व पुणे येथे नष्ट करण्यात आला असून उर्वरित माल नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुटख्यातून शासनाला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च यापासून उद्भवणाऱ्या आजारांच्या उपचारासाठी होत आहे. गुटखा बंदीतून व्यसनाधिनता कमी होत असून त्याचे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत. नागपूरच्या दंत संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे, अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आले.