दशकभरापूर्वी ठाणे शहरात गणेश विसर्जनासाठी अवलंबण्यात येऊ लागलेल्या कृत्रिम तलावांच्या पर्यावरणस्नेही पर्यायास आता अंबरनाथमध्येही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. शहरातील कोहोजगाव, कानसई आदी विभागांत कृत्रिम तलाव उभारण्यात येऊन त्यात गणेश विसर्जन केले जाऊ लागले आहे. कानसई गणेशोत्सव मंडळाने शहरात १३ वर्षांपूर्वी गणपती विसर्जनासाठी कायमस्वरूपी हौद बांधला असून त्यात विभागातील गौरी-गणपतींचे विसर्जन केले जाते. शहरातील ८० गणेश मूर्तीचे त्यात विसर्जन केले जाते.
गेल्या दोन वर्षांपासून नेहरू उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. स्थानिक युवकांनी त्यात पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणे यंदा पश्चिम विभागातील कोहोजगांव परिसरातील युवकांनीही गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केला आहे. शहरातील गोविंद तीर्थ पूल नाला, काकोळे तलाव तसेच शिवमंदिराजवळून वाहणाऱ्या वालधुनी नदीत गणेश विसर्जन केले जाते. मात्र थेट पाण्याच्या प्रवाहात मूर्तीचे विसर्जन करणे पर्यावरणीयदृष्टय़ा हानीकारक असल्याचे लक्षात येऊ लागल्याने हळूहळू का होईना पण नागरिक अन्य पर्याय स्वीकारू लागले आहेत.