पहाटे झोपेत असताना जोधपूर-बेंगलोर एक्स्प्रेसमध्ये आरक्षित बोगीत ४० ते ५० प्रवाशांच्या बॅगांची चोरी झाली असून, सुमारे ५ लाख रुपयांचा माल चालत्या रेल्वेतून लंपास करण्याची घटना शुक्रवारी घडली. साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचा प्रयत्न असफल ठरल्याने मिरज स्थानकावर संतप्त प्रवाशांनी एक तास रेल्वे रोखून ठेवली.
    जोधपूरहून बेंगलोरला जाणारी एक्स्प्रेस पुण्याहून पहाटे मिरजेकडे येण्यास निघाली. या गाडीच्या एस-८ या बोगीत असणाऱ्या प्रवाशांच्या साहित्याची चोरी झाल्याची घटना पहाटे पावणेचार वाजता लक्षात आली. १० ते १२ वेळा साखळी खेचून गाडी थांबविण्याचे प्रयत्न झाले. मात्र गाडीच्या रक्षकाने गाडी थांबविण्यास नकार देत तशीच पुढे आणली. ही गाडी सकाळी १०.३० वाजता मिरज स्थानकावर येताच प्रवाशांचा संताप अनावर झाला. या चोरीप्रकरणी तक्रारी दाखल केल्याशिवाय गाडी मिरज स्थानकाबाहेर जाऊ  देणार नाही अशी भूमिका प्रवाशांनी घेतली. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता.
    गाडीतील चोरीप्रकरणी सहा प्रवाशांनी मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात रीतसर चोरीची फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये नरपतसिंग पुरोहित (धारवाड), कनकमल टिंगड (उदयपूर), मेहूमल दुर्गानी (बेंगलोर), सुनील जैन (हुबळी), जयंतिलाल जैन (हुबळी) आणि रमेशचंद्र जैन (म्हैसूर) या सहा प्रवाशांनी आपले साहित्य चोरीस गेले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. यापकी कनकमल टिंगड यांच्या बॅगमधील २ लाख २२ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. याशिवाय अन्य प्रवाशांचे कपडे, मोबाइल, रोखड अशा ३ लाख ६२ हजार ५०० रुपये ऐवजाची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.  मात्र एस-८ या बोगीमधून प्रवास करणाऱ्या बहुसंख्य प्रवाशांच्या बॅगा लंपास झाल्या आहेत.