विद्यार्थ्यांवर जबाबदार नागरिकत्वाचे संस्कार करण्यासाठी येथील सरस्वती मंदिर ट्रस्ट पूर्व प्राथमिक विभाग शाळेने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी शहरामधून शोभायात्रा काढली. ‘लोकसत्ता’मध्ये ‘बालमैफल’ विभागात प्रसिद्ध झालेल्या गोष्टीतील अतुल्य भारत या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या घोषणा फलकांवर ‘मातृभूमी महान करण्याचे काम फक्त माझेच आहे’, ‘सार्वजनिक स्वच्छता’, ‘भ्रष्टाचारमुक्ती’ आदी घोषणा होत्या.
विविध जाती-धर्माचे सण मोठय़ा प्रमाणावर साजरे केले जातात. त्याचप्रमाणे १५ ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण म्हणून सर्व जाती-धर्म-पंथांच्या लोकांनी साजरा करावा हा हेतू शोभायात्रा काढण्यामागे होता. पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे पालक, शिक्षक तसेच मुख्याध्यापिका रती भोसेकर यांच्यासह अनेक जण या शोभायात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.