स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जळगाव येथे राज्यस्तरीय युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विवेकानंदांचे विचार युवकांच्या माध्यमातून राज्यात सर्वत्र पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संजय कोडगे यांनी ही माहिती दिली. त्यांच्या उपस्थितीत नगरमध्ये मोर्चाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रदेश उपाध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा सरचिटणीस भानुदास बेरड, शहर सरचिटणीस जगन्नाथ निंबाळकर यावेळी उपस्थित होते. युवा मोर्चाचे सरचिटणीस युवराज पोटे, तसेच शहराध्यक्ष प्रवीण ढोणे यांनी कोडगे यांचे स्वागत केले. जळगाव येथे होणाऱ्या युवा संमेलनासाठी नगर जिल्ह्य़ातून जास्तीत जास्त युवक उपस्थित राहतील, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन कोडगे यांनी पदाधिकाऱ्यांना केले.