रधानमंत्री ग्रामसडक योजनेसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्ह्य़ात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची गुणवत्ता तपासून वॉरंटी कालावधीतील खराब रस्त्यांची संबंधित कंत्राटदाराकडून दुरुस्ती करून घ्यावी, असे आदेश महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी दिले. कामात हयगय करणाऱ्या कंत्राटदारांचा समावेश काळ्या यादीत करून रस्त्यावरील कामांचा खर्च वसूल करावा, अशा सूचनाही सोळंके यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. आमदार बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे, प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, कार्यकारी अभियंता आर. एन. पटवेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे आदी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभाग, जि. प.च्या अखत्यारितील रस्त्यांच्या अवस्थेबाबत बैठकीत चर्चा झाली. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री सोळंके म्हणाले की, ज्या कंत्राटदारांनी कामे करताना गुणवत्ता राखली नाही, त्यांना नियमानुसार नोटीस देऊन दंड आकारावा, वॉरंटी कालावधीत कामे दुरुस्त करावीत. कामात हयगय करणाऱ्या कंत्राटदारांचा समावेश काळ्या यादीत करावा. रस्त्यावरील कामांचा खर्च वसूल करावा. औरंगाबादच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या गुणवत्ता नियंत्रण व प्रमाणीकरण यंत्रणेकडून रस्त्यांच्या कामांची तपासणी करावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी जिल्ह्य़ातील रोजगार हमी योजनेच्या कामांची माहिती दिली. जिल्ह्य़ात या योजनेंतर्गत एकूण २९६ कामे चालू आहेत. त्यावर ३०४१ मजुरांची उपस्थिती आहे. सेल्फवरील कामांची संख्या ६ हजार ४९७ आहे. सोळंके यांनी या कामांचा आढावा घेतला.