सत्तर एमएमच्या भव्य पडद्यावर सिनेमाची एक नवीच गोष्ट सुरू झाली होती. सेल्युलॉईडवर स्वप्नांची दुनिया विकणाऱ्या बॉलीवूड नामक चित्रनगरीत दोन पाटय़ा असलेले क्लब दिसत होते. एकावर पाटी होती ‘शंभर कोटी क्लब’ आणि दुसऱ्यावर ‘दोनशे कोटी क्लब’. त्यातल्या एका क्लबच्या दारातून चुलबुल पांडे प्रवेश करता झाला. त्याच्यासमोर उभे होते ‘बाजीराव सिंघम’ आणि ‘रावडी राठोड.’ तिथे दुरून त्या दोनशे कोटी क्लबच्या दाराआडून ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ या सगळ्या हालचालींवर गपचूप लक्ष ठेवून होता. आल्या आल्या पांडेजींनी आपला डायलॉग टाकला, ‘स्वागत नही करोंगे हमारा..’
त्याच्या या खूशभऱ्या डायलॉगवर डोकं सटकलं ते बाजीराव सिंघमचं, ‘अरे! कोटय़वधी रुपये उधळून स्वागत झालं की रे तुझं. तरीही तुझं समाधान होत नाही. तुझं हे स्वागत म्हणजे आमच्यासाठी डोकेदुखी झाली आहे.’ सिंघम मोठय़ा तळमळीने त्याला सांगत होता. ‘वाटलं होतं हे वर्षभर मेहनत केली तेव्हा कुठे शंभर कोटीची कमाई करता आली. आता पुढचं वर्ष तरी निवांत जाईल. पण तुला सवड कुठली? तुझ्या ‘टायगर’ने आमची वर्षभराची मेहनत पार धुळीला मिळवली आहे,’ इति सिंघम. बाजीरावाच्या या हल्ल्याने चुलबुल पांडे थोडासा बिथरला होता. त्याच्या डोक्यात याची बडबड काही घुसत नव्हती. ‘असं आपण केलंय तरी काय?’ चुलबुलच्या मनातला प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला होता. तो बघून सिंघम आणखीनच वैतागून पुढे म्हणाला, ‘गेल्या वर्षी तुम्ही पांडेजींचा अवतार धारण करून जी काही ‘दबंग’गिरी केलीत त्यासाठी लोकांनी शंभर कोटींची गंगाजळी तुमच्या खिशात रिती केली. तुमचा भाव वधारला. निर्माते तुमच्यासाठी वाटेल तेवढा पैसा मोजायला तयार झाले.’ मग यात बिघडलं कुठे? पांडेजींचा प्रतिप्रश्न. ‘‘बिघडलं तुमचं नाही हो..बिघडलं ते आमचं. तुम्हीही मिळवून दाखवा शंभर कोटी. तुम्हालाही हवे तितके चित्रपट देतो,’ अशी निर्मात्यांची उत्तरं आम्हाला ऐकावी लागली. खोटं वाटत असेल तर विचारा या रावडी राठोडला. एवढा वेळ हे सारे शांतपणे ऐकत बसलेल्या राठोडने आताही केवळ मान हलवत आपलं मनातलं चिंताता.. सुरूच ठेवलं.
गेल्या वर्षी मी बाजीराव सिंघम झालो. प्रामाणिक पोलीस म्हणून राजकारण्यांना फटके दिले. सगळ्या भ्रष्टव्यवस्थेला पुरून उरलो. लोकांना ते खूप आवडलं. त्यांना असा कर्तव्यदक्ष, समोरच्याची भीड न ठेवता त्याची जागा दाखवून देणारा हिरो खूप आवडला. लोकांनी डोक्यावरच घेतलं मला. माझं नाव ‘सिंघम’च पडून गेलं आहे जणू. आता मी सिंघम झालो म्हणून मग यालाही यावर्षी पोलीस बनून रावडी खाक्या दाखवावा लागला. तर त्याचा तो रावडीपणाही शंभर कोटीला खपला. मग आमच्यामागे रांगच लागली ‘अग्निपथ’ म्हणू नको, ‘बर्फी’ म्हणू नको. बरं लोकांना मारधाडवाले चित्रपट आवडतात असं म्हणावं तर तो साजिदचा म्हणजे याचाच बिनडोक ‘हाऊसफुल्ल २’, माझा ‘बोलबच्चन’ सगळ्यांचीच कमाई शंभर कोटी रुपये. म्हणजे या प्रेक्षकांना नेमके कोणते चित्रपट आवडतात म्हणायचे?
एवढा वेळ शंभर कोटींची यादी ऐकणाऱ्या पांडेजींना आपल्या लाडक्या शत्रूची आठवण झाली. त्या ‘रा. वन’वाल्या जी. वनला सिंघमच तर नडला होता ना ‘सन ऑफ सरदार’साठी. न राहवून पांडेजींनी सिंघमला म्हटलं, ‘‘तू त्या जी. वनची चांगली जिरवलीस. बरं झालं नेहमी मीच हिरो म्हणून भाव खात असतो. तरी बरं यशजींनी ‘जब तक है जान’ म्हणत चित्रपट बनवला आणि अखेरचा श्वास घेतला. त्यांची पुण्याई म्हणून इथे नाही पण परदेशात तरी त्यांची जान राहिली. एनआरआय खरे ‘दिलवाले’ म्हणायचे अगदी टॉप टेनमध्ये आणून ‘जी. व’न वाचवला त्यांनी.’ तिकडे जी. वन सध्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये असल्या कारणाने वाद वाढला नाही. पण, सिंघमला या आपल्या कृतीचं काही फार कौतुक नव्हतं, असं पांडेजींना जाणवल्यावर ते पुन्हा शांत झाले.
त्याने काय फरक पडतो आहे, सिंघमची जुनी टेप पुन्हा सुरू झाली. ‘‘अरे, सिंघमच्या शंभर कोटी कमाईवर माझा ‘सन ऑफ सरदार’ चालला  पुन्हा शंभर कोटी कमावले. पण म्हणून मी ‘सिंघम २’ नाही ना करू शकणार. आणि आता मराठी झाले, सरदार झाले, आणखी किती देशी हिरो करणार? बरं, देशी हिरोच चालतात, असंही नाही. तो ‘विकी डोनर’सारखा चित्रपट, त्याचा हिरोगिरीशी काय संबंध. पण, तोही धो धो चालला. तो कालचा खुराणा आता इथे आयुषमानच होत चालला आहे. पुन्हा रणबीरची ‘बर्फी’ अजून प्रेक्षकांच्या ओठावर रुळते आहे. तो इम्रान खानही आहे, हाश्मीही आहे, शाहीद आहे, अर्जून कपूर, पुन्हा सिंग आडनावाचा रणवीर आहे ही यादी कमी होतेय की काय..सारे दाक्षिणात्य नट इथेच भरले आहेत. कसं काय प्रत्येक चित्रपटामागे हे शंभर कोटीचं गणित जुळवायचं?, चिंतेत बुडालेल्या सिंघमला रावडीचे सूर ऐकू येतात..चिंता.ता.चिता चिता..
‘‘आता यावर्षी तुझ्या टायगरने दोनशे कोटी रुपयांचा नवा पायंडा आणलाय. त्याचा विचार करूनच आमचं धाबं दणाणलं आहे. तुला बरं आहे तू दबंग २, ३ असं काहीही करू शकतोस.’’ आता रावडी राठोडने या वादात उडी घेतली होती. ‘‘मित्रहो असं काही नसतं.’’ पांडेजी बोलते झाले. ‘हे शंभर-दोनशे काही खरं नसतं. आता हेच बघा ‘एक था टायगर’ने दोनशे कोटी मिळवले, पण कुठे परदेशात. म्हणून चुलबुलच्या दुसऱ्या अध्यायातल्या कारनाम्यांनाही तेवढेच मिळतील, असा विचार करणंही मला परवडणारं नाही. कारण आपणच मोठे असं आपण म्हणतोय पण, तिथे विद्याची ‘कहानी’ जोरदार आहे. श्रीला पंधरा वर्षांनी का होईना ‘इंग्लिश विंग्लिश’ जमू लागलं आहे, प्रियांका ‘इन माय सिटी’ गात आंतरराष्ट्रीय धुमाकूळ घालत आहे. करिनाची ‘हिरॉईन’ तर फुल्ल फॉर्मात आहे. यांना विसरून कसं चालेल?, पांडेजींच्या म्हणण्यात तथ्य होतं. ‘यावर्षी दोनशे कोटीपेक्षाही भीती आहे ती प्रेक्षकांच्या कौलाची’, पांडेजींना आणखी एक गुगली टाकली. ‘काय आहे ना?, इथे अजून एक अदृष्य क्लब आहे तो दिग्दर्शकांचा. ‘चित्रपट मोठमोठय़ा कलाकारांच्या नावावर नव्हे आमच्या आशयघन चित्रपटांवर चालतात, असं त्यांचं म्हणणं आहे. तो अनुराग कश्यप आहे, अनुराग बसू, हबीब फैजल, तिग्मांशू धुलिया, विशाल भारद्वाज..वर्षभर ते महोत्सवांमधूनच फिरत असतात. त्यांनी आपला क्लब थाटला नाही एवढंच. बरं आपल्यावर कोटय़वधी उधळणाऱ्या प्रेक्षकांचा त्यांनाही पाठिंबा आहेच. कारण एकाच चवीच्या गोष्टी त्यांनाही आवडत नाहीत.’ पांडेजींनी मांडलेल्या या विचाराने सिंघम आणि राठोड आणखीच चिंतेत बुडाले होते.
तिकडे पांडेजींची नजर मात्र दोनशे कोटी क्लबच्या दाराआड असलेल्या आपल्या मित्राचा वेध घेत होती. हा मित्र भलताच चतुर होता. त्याची सर्जनशील कलाकृतींची ‘तलाश’ नाही म्हटली तरी चुलबुलला महागच पडत होती. चुलबुल त्याला नजरेनेच येऊ का क्लबमध्ये म्हणून खुणावत होता. मात्र त्याच्या मिस्टर परफे क्शनिस्ट मित्राच्या डोळ्यात स्वागताऐवजी ‘१९८ कोटी’चा आकडा दिसत होता. त्या दारात शिरण्यासाठी देशातच अवघे दोन कोटी रुपये पांडेजींना कमी पडले होते. पण म्हणून पांडेजी शांत बसणारे नाहीत. त्यांची चुलबुलगिरी सुरू झाली आहे. सरत्या वर्षांला निरोप देताना ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. २०१२ चं सिनेमाहात्म्य इथेच सुफळ संपूर्ण होत असताना पांडेजींच्या दुसऱ्या ‘दबंग’ अध्यायाला सुरुवात झाली आहे. त्यांनी पुन्हा तोच प्रश्न आपल्या चाहत्यांना टाकला आहे, ‘स्वागत नही करोंगे हमारा..’