यूपीए सरकारने शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या भूसंपादन कायद्यामध्ये केंद्रातील विद्यमान भाजपा सरकारने नवीन अध्यादेशाद्वारे भूमालक शेतकऱ्यांच्या जाचक ठरणाऱ्या धोरणांमधील बदल रद्द करणे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव मोठया प्रमाणावर कमी होऊनसुद्धा देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी न करता सर्वसामान्य जनतेविरोधात भाजपाप्रणीत सरकारने राबविलेल्या धोरणांच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी कोकण भवनवर धडक मोर्चा काढला. कायद्यात केलेल्या सुधारणांचा निषेध करण्यासाठी किसान सत्याग्रह नावाने युवक काँग्रेसने मोर्चाचे आयोजन केले होते. सरकारच्या धोरणाचा निषेध करून नवीन भूमी अधिग्रहण कायद्यातील वटहुकूम तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
भाजपा सरकारने भूमी अधिग्रहण कायदा केला, मात्र या कयाद्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कायद्यानुसार सरकार शेतकऱ्यांची कोणतीही जमीन सहमती न घेता ताब्यात घेऊ शकतो, तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याची अट रद्द करण्यात आली आहे. जमिनीची किंमत ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना राहणार नाही. संपादित जमीन प्रकल्पासाठी वापर न झाल्यास शेतकऱ्याला परत करण्याची मुदत ५ वष्रे होती. आता ती १० वष्रे करण्यात आली आहे. त्याचबरोबर भूसंपादन करताना नोटिफिकेशन अथवा जाहिराती दिल्या जाणार नसल्याचे या कायाद्यामध्ये नमूद केले आहे. या कायद्यात केलेल्या सुधारणांचा निषेध करण्यासाठी किसान सत्याग्रह नावाने युवक कँाग्रेसने मोर्चाचे आयोजन केले होते. ठाणे लोकसभा मतदार संघाचे युवक कँाग्रेस अध्यक्ष निशांत भगत यांनी केंद्र शासनाच्या धोरणावर टीका करत सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत आहे. भूमी अधिग्रहण कायद्यातील सुधारणा अन्यायकारक आहे. याविषयीचा अध्यादेश रद्द करेपर्यत आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचा निर्धार यावेळी भगत यांनी केला.