बदलापूरमधील १२ मागण्यांचा पाठपुरावा
कल्याण-कसारा मार्गावरील टिटवाळा आणि खडवलीदरम्यान गुरवली स्थानकास रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर आता कल्याण-कर्जत मार्गावरील अंबरनाथ-बदलापूरदरम्यान बहुप्रतीक्षित नियोजित चिखलोली स्थानकासाठी येथील प्रवाशांकडून आग्रह धरला जात आहे.
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील अंबरनाथ आणि बदलापूर शहरांची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असून दोघांमध्ये आठ किलोमीटर अंतर आहे. सध्या रेल्वेव्यतिरिक्त कोणतीही परिवहन सेवा दोन्ही शहरांत नसल्याने वेशीवर राहणाऱ्या नागरिकांना केवळ रिक्षांवर अवलंबून राहावे लागते.  
शुक्रवारी, २७ सप्टेंबर रोजी मुंबईत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक असून त्यात चिखलोली स्थानकासह या परिसरातील रेल्वेसंदर्भातील १२ मागण्यांचा पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती या संघटनेचे सदस्य आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिली. बदलापूर पालिकेने तीन वर्षांपूर्वी निधी देऊनही पूर्व-पश्चिम विभागांना जोडणारा स्कायवॉक अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही. ते काम त्वरित पूर्ण करावे, भुयारी गटार योजनेसाठी परवानगी द्यावी. बदलापूर स्थानकातील स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी, फलाटांची उंची वाढवावी, आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.