जिल्हय़ात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत अनेक गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्या. योजनेचा निधी शिल्लक असताना पुन्हा ५ कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाला जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी फटकारले असून त्रुटीची तात्काळ पूर्तता करून घेण्याचे आदेश काढले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात पाच तालुक्यांतील रोहयोशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच घेण्यात आली.
या बैठकीत अनेक गंभीर स्वरूपाच्या त्रुटी निदर्शनास आल्या. त्या तातडीने दूर कराव्यात, अशी सूचना जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी केली.
ऑनलाईन नोंदणीची प्रगती धिम्या गतीने चालू आहे, निधी उपलब्ध असतानाही निधीचे वितरण झाले नाही, तसेच हजेरीपट व मोजमाप पुस्तिका याच्यावर गटविकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नसणे, काम पूर्णत्वाचे दाखले न देणे, शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत रोपवाटिकातील रोपांची संख्या तपासणे तसेच जिवंत रोपांची टक्केवारी, त्यावर झालेला एकूण खर्च या प्रकारच्या माहितीत त्रुटी आढळून आल्याने अधिकाऱ्यांमार्फत त्याची तपासणी करावी, आदी १७ मुद्यांची पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत.