गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अमिताभ राजन यांच्यासह ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एस.एस. संधू आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव एस.के. मुखर्जी यांनी गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत जिल्ह्य़ातील प्रगतीपथावर आणि प्रलंबित असलेल्या विविध खात्याच्या कामांचा आढावा घेतला.
जिल्ह्य़ात सुरू असलेली विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वय राखून दिलेले उद्दिष्ट निश्चित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी राज्याच्या गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव अमिताभ राजन यांनी दिल्या. यावेळी विभागीय आयुक्त बी.व्ही. गोपाल रेड्डी, नक्षलवाद सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनुपकुमार, गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त  के.एल. प्रसाद, गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, पोलीस अधीक्षक मो. सुवेज हक, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी संजय धिवरे, अधीक्षक अभियंता गो.आ. मेंगडे, अ.अ. सगणे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे मुख्य अभियंता पी.एल. कडू उपस्थित होते.
जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर विकास कामे सुरू असून काही कामे अपूर्णावस्थेत आहेत. ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचे नियोजन करावे. अतिदुर्गम भागातील कामे करताना अडचणी लक्षात घेता त्या कशा पद्धतीने पूर्ण करता येतील, यासाठी अधिकाऱ्यांनी विविध प्रशासकीय यंत्रणांशी संपर्क साधून प्रयत्न करावे. गोदावरी नदीवरील आंध्रप्रदेशात जोडणारा सिरोंचा-कालेश्वरजवळील तसेच इंद्रावती नदीवरील पुलाच्या बांधकामाची माहिती घेतली आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्याही सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
यावेळी ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एस.एस. संधू यांनी आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची विस्तृतपणे माहिती जाणून घेतली आणि ज्या विकास कामासाठी निधीची आवश्यकता आहे त्यांनी सुधारित नवीन प्रस्ताव सादर करावे, त्वरित निधी उपलब्ध करून देता येईल, असे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.