धनंजय महाडिक युवा शक्तीच्या तिघा पदाधिकाऱ्यांना पाचगाव खून प्रकरणात अडकविण्याचे कटकारस्थान सूर्याजी पिसाळ याने केले आहे, अशा शब्दात भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर गुरुवारी शाब्दिक प्रहार चढविला. पाचगाव येथे गेल्या आठवडय़ामध्ये सतेज पाटील समर्थकाचा खुनाचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर पोलिसांनी धनंजय महाडिक युवा शक्तीच्या अमोल माने, रहिम सनदी व अजित कोरे या तिघा पदाधिकाऱ्यांवर खुनाच्या आरोप घेऊन कारवाई केली. या घटनेबाबत बोलताना महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, गुंडगिरीचे समर्थन आम्ही अजिबात करणार नाही. मात्र चांगल्या घरातील चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदाचा गैरवापर करून खुनाच्या प्रकारात गुंतवून आयुष्यातून उठविण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. खून घडला त्या दिवशी युवा शक्तीचे हे तिघेही पदाधिकारी माझ्यासोबत सिकंदर टाकळी येथे भीमराव महाडिक पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाला रात्री दहा वाजेपर्यंत उपस्थित होते. खुनाचा प्रकार रात्री सात वाजता घडला होता. त्यामुळे तिघांचाही या घटनेशी अर्थाअर्थी संबंध नाही. तरीही त्यांना खुनाच्या प्रकारात गोवण्याचे कटकारस्थान सूर्याजी पिसाळ यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कोल्हापूर लोकसभेसाठी धनंजय महाडिक यांच्या नावाचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे निवडणुकीची तयारी कशी सुरू केली आहे, याबाबत विचारले असता महाडिक म्हणाले, पवारांनी माझ्या नावाची घोषणा केल्याचा आनंद जरूर आहे. पण अद्याप कोल्हापूरची जागा काँग्रेस पक्षाकडे जाणार की राष्ट्रवादी हे निश्चित नाही. जागा वाटपाचा प्रश्न वरिष्ठ पातळीवर सुटल्यानंतर त्याची स्पष्टता होईल. तथापि, लोकसभा निवडणुकीचा प्रचार युवा शक्तीच्या माध्यमातून मी सुरू केलेला आहे. २००४ साली लोकसभेची निवडणूक लढविताना मला ४ लाख मते मिळाली होती. या निवडणुकीत पराभतू झालो तरी लोकांचा सकारात्मक प्रतिसाद डोळ्यासमोर ठेवून २००९ ची निवडणूक लढण्याचे जाहीर केले होते, तेव्हा उमेदवारी मिळाली नव्हती. मात्र या वेळची निवडणूक निश्चितपणे लढविण्याचे ठरविले असून त्या दिशेने प्रयत्नही सुरू आहेत. थेट पाणी योजनेवरून सुरू असलेल्या श्रेयवादात महाडिक यांनी उडी घेताना सतेज पाटील यांच्यावर तोंडसुख घेतले. ते म्हणाले, ३५ वर्षांपूर्वीचा हा प्रश्न असताना त्याचे श्रेय लाटण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. आमच्या मित्राने श्रेय घेणारे फलक लावले आहेत. या प्रश्नाचे त्यांना श्रेय घ्यायचे असेल, तर त्यांनी योजनेची १० टक्के लोकवर्गणी भरावी. ते मोठे उद्योजक असल्याने लोकवर्गणीचा खर्च त्यांना सहज झेपणारा आहे. निवडणुका जवळ आल्याने भूमिपूजन करून श्रेय खेचण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.