दिवाळी झाली, पण फटाके तसे फुटलेच नाहीत. काय कारण असावे, याचे कोडे फटाका विक्रेत्यांनाही सुटता सुटेना, अशी अवस्था आहे. काय झाले माहीत नाही, पण फटाका विक्रीत ३५ ते ४० टक्के घट झाली. महागाई, मंदी यामुळे पसा वेळवर हातात न आल्याने फटाक्यांची विक्री कमी झाली असावी, असे सांगितले जाते. शिवाकाशी येथून आणलेले फटाके पडून राहिल्याने व्यापारी हैराण झाले आहेत.
औरंगाबाद शहरात जिल्हा परिषदेच्या मदानात फटाक्यांची दुकाने लागतात. या वर्षी तुलनेने अधिक दुकाने उभारण्यात आली. मात्र, दिवाळीपूर्वी फटाके खरेदीसाठी तशी गर्दी झालीच नाही. केवळ फटाकेच नाही, तर कपडय़ांच्या खरेदीलाही फटका बसला. दिवाळीत दरवर्षी राष्ट्रीय हातमाग प्रदर्शन भरते. या वर्षी दोन कोटींची उलाढाल या प्रदर्शनात झाली. साधारण आठ कोटींची उलाढाल होणे अपेक्षित होते. फटाका विक्रेते राजेंद्र पारगावकर म्हणाले की, तसे कारण फटाका व्यापाऱ्यांनाही कळाले नाही. मात्र, मंदीचा परिणाम असू शकतो. प्रदूषण होत असल्याच्या मानसिकतेमुळे फटाके खरेदी झाली नाही. या म्हणण्यात फारसे तथ्य नसल्याचे ते म्हणाले. तसे असते तर ज्यांनी फटाके उडविले त्यांनी फटाके खरेदी करताना आवाजाचे फटके देऊ नका, असे सांगितले असते. तसे झाले नाही. काही तरी बाजारपेठेतल्या अर्थकारणात चूक आहे. त्यामुळे फटाके विक्री झाली नाही. मुख्य कारण महागाईच असावे, असे व्यापाऱ्यांना वाटते.