भारतीय हापूस आंब्यात कीटक (फ्रूट प्लॉय) आढळल्याने सर्व प्रकारच्या आंब्यांबरोबरच चार भाज्यांनादेखील युरोप बंदीचा सामना करावा लागत असल्याने हापूस आंबा निर्यातदारांनी आता सर्व लक्ष आखाती देश विशेषत: दुबईवर केंद्रित केले आहे. मुंबई एपीएमसीच्या घाऊक बाजारात येणाऱ्या एकूण हापूस आंब्यापैकी ४० टक्के हापूस सध्या दुबईत निर्यात होत आहे. दुबईत निर्यातीसाठी कोणत्याही जाचक अटी नसून अरबांच्या दुबई, सौदी अरेबिया या आखाती सात राज्यांत हापूस आंब्याला मोठी मागणी आहे.
युरोपमध्ये आंबा पाठविताना थोडी काळजी घेऊन पाठवा, त्यासाठी त्यावर हीट वॉटर ट्रीटमेंट करा असे युरोपियन युनियन गेली दोन वर्षे भारतीय व्यापाऱ्यांना ओरडून सांगत होती. त्यानुसार अपेडाही या व्यापाऱ्यांना वेळोवेळी तंबी देण्याचे काम करीत आहे, पण निर्यातदारांमध्ये घुसलेल्या काही पश्चिम, उत्तर भारतीय निर्यातदारांच्या अपप्रवृतीमुळे युरोपचे हे सर्व नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र होते. निर्यातदारांमध्ये सुरू असलेल्या जीवघेण्या स्पर्धेपोटी खराब आंबे पाठविण्याचे प्रकारदेखील घडलेले आहेत. त्याचा परिणाम युरोपियन युनियनने आंब्यांबरोबर वांगी, घोसाळे, आलू आणि कारळी या भाज्यांना युरोप बंदीचा झेंडा दाखविला आहे. भाज्यांची वर्षभर होणारी निर्यात ही तुरळक प्रमाणात होती, पण हापूस आंब्यावर निर्यातदारांची फार मोठी मदार मानली जात आहे. सुमारे १०० कोटी रुपये किमतीचा हापूस आंबा या काळात युरोपमध्ये पाठविला जात असतो, त्यावर निर्यातदारांना पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे युरोपमध्ये जाणारा आंबा दुसरीकडे वळविताना आखाती देशांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून सध्या ४० टक्के माल आखाती देशांत जात असल्याचे निर्यातदार मोहन डोंगरे यांनी स्पष्ट केले. आखाती देश आणि आंबा हे एक समीकरण असून आखाती देशातील दुबई, सौदी अरेबिया आदी सात राज्यांत हापूस आंब्याला, तेही कोकणातील हापूसला मोठी मागणी आहे. त्यानंतर सिंगापूरला राहणाऱ्या भारतीयांच्या जिभेची चव हापूस पूर्ण करीत आहे.

 सोमवारी ५८ हजार पेटय़ांची विक्रमी आवक
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंबा बाजारात पाठविण्याची कोकणातील जुनी पद्धत आहे. आता कोकणाबरोबर कर्नाटक, तामिळनाडू या दक्षिण भागांतून हापूस आंबा मोठय़ा प्रमाणात पाठविला जात असून सोमवारच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याच्या ५८ हजार पेटय़ा एपीएमसी बाजारात आल्याची नोंद आहे. यात बदामी, लालबाग, तोतापुरी यांसारख्या आंब्यांचाही समावेश आहे. या वर्षी कोकणातील हापूस आंब्याची गुणवत्ता ढासळणार असल्याचे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत.