यंदाच्या गळीत हंगामात पावसाअभावी निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी उसाच्या रसातील पाण्याचा वापर करून कारखाना आणि डिस्टिलरी चालविली जात असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे यांनी दिली.केशेगाव येथील डॉ. आंबेडकर कारखान्याची १५वी वार्षिक सभा गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी गोरे म्हणाले, कारखान्याने खोडवा ऊस व्यवस्थापन, ऊस बेणे प्लॉट आणि ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करून योजनांची प्राधान्याने अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. त्यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. पावसाअभावी यंदा वडाळा तलावात लीटरभरही पाणी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत उसाच्या रसातील पाण्याचा वापर करून कारखाना चालविला जात आहे. विहिरी, बोअरचे पाणी कमी झाल्यावरही खोडवा ऊस जोपासण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे. ठिबक सिंचन योजनेस प्राधान्य देऊन संचालक मंडळ काम करीत आहे. त्यामुळे पुढील गळीत हंगामासाठी ऊस उपलब्ध करण्याचा प्रयत्न चालू आहे. या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन गोरे यांनी केले. कार्यालय अधीक्षक एम. बी. बिडवे यांनी विषय वाचन केले. या वेळी आंबेडकर कारखाना परिवारातील सदस्य, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.