शहरातील शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना सायकलवरून शाळेत ये-जा करण्यासाठी स्वतंत्र रस्ते उपलब्ध करावे, शाळांना स्वत:चे मैदान असलेच पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आहाराविषयी आवश्यक जाणीवजागृती निर्माण करावी, तसेच मुलांच्या आरोग्यास हानिकारक ठरणारे अन्नपदार्थ व गोड पेये यांच्या विक्रीस बंदी करावी आदी मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना शनिवारी देण्यात आले.
सोमवारी (दि. २६) जागतिक स्थूलता दिन आहे. या पाश्र्वभूमीवर मुलांमध्ये अलीकडच्या काही वर्षांपासून वाढीस लागलेला स्थूलपणा व त्याचे दिसू लागलेले दुष्परिणाम याची माहिती इंडियन मेडीकल असोसिएशनच्या (आयएमए) वतीने पत्रकार बैठकीत देण्यात आली. ‘आयएमए’चे सचिव डॉ. अतुल जोशी, इंडियन पेडीयाट्रिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र खडके व सम्राट एंडोक्राइन इन्स्टिटय़ूटचे डॉ. हेमंत फटाले यांनी हे निवेदन दिले. डॉ. प्रीती फटाले यांनी वेगवेगळ्या स्लाइडच्या आधारे पत्रकारांना मुलांमध्ये वाढता स्थूलपणा व त्याचे परिणाम याची माहिती दिली. कुपोषण हे बालमृत्यूचे प्रमुख कारण असलेल्या आपल्या देशात लठ्ठपणाही झपाटय़ाने वाढत आहे. जीवनशैलीत झालेला बदल, लठ्ठपणाबाबत समज-गैरसमज आदी कारणे या मागे आहेत. लठ्ठपणामुळे मुलांमध्ये मधुमेह, हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी या संघटनांनी हे निवेदन दिले.