विधानसभा निवडणुकीचा ‘ज्वर’ आता चढू लागला आहे. पानाच्या टपऱ्या, चहाच्या गाडय़ा, भाजीबाजार, शहरातील चौक अशा सार्वजनिक ठिकाणीच काय, पण बँका, विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये व सर्वसामान्यांतही निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या जय-पराजयाची गणिते मांडण्याबरोबरच प्रमुख उमेदवारांच्या कोटय़वधींच्या संपत्तीचीही चर्चा नागरिकांमध्ये आहे.
विधानसभा निवडणुकीला आठ दिवस शिल्लक असून शहरात आणि ग्रामीण भागात सामान्य लोकांमध्ये निवडणुकीबाबत चर्चा रंगू लागली आहे. सध्या पाऊस नसल्यामुळे आणि मधल्या काळात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असताना त्या गोष्टीचा राजकीय पक्षांना विसर पडत असताना सामान्य नागरिक त्याबाबत काहीच न बोलता कोण विजयी होईल? महायुती आणि आघाडी संपुष्टात आल्यानंतर चारही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असताना कोणाची सत्ता येईल? याबाबत गणिते मांडली जात आहेत.
निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक उमेदवाराने संपत्तीचे दाखले दिले असून त्यातून प्रत्येक उमेदवारांकडे किती संपत्ती आहे याची माहिती जनतेला झाली आहे. निवडणूक आयोगाने ही एक चांगली पद्धत सुरू केली, असे काहींचे मत असले, तरी बऱ्याच जणांना मात्र संपत्तीचे विवरण जाहीर करणे म्हणजे केवळ एक उपचारच असल्याचे वाटते. ‘यापेक्षा न दाखवलेली संपत्ती कितीतरी असणार’, असे स्पष्टपणे बोलून दाखवण्यात येते. त्यात पुन्हा अर्जाची छाननी करताना संपत्तीचे दिलेले विवरण खरे की खोटे याचा काही संबंध नसल्याने बहुतेकांना तो केवळ उपचार वाटतो. गुन्ह्य़ांबाबत मात्र किमान त्यामुळे उमेदवार कसा आहे ते समोर येते, असे काहींना वाटते. उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रकावर सादर केलेली ही माहिती प्रसिद्धीमाध्यमातून जाहीर होत असल्याचेही अनेक नागरिकांना समाधान आहे. उमेदवारांवर लावण्यात आलेल्या काही निबर्ंधावर जनता खूष आहेत.
भिंती रंगवून खराब होत नाहीत, पोस्टर्सची फारशी गर्दी दिसत नाही व  ध्वनीक्षेपकासह रिक्षा मोठय़ा संख्येने फिरत नाहीत. ‘हे फार चांगले झाले’ अशाच शब्दात बहुसंख्य नागरिक याबाबत आपल्या भावना व्यक्त करतात. प्रचारफेऱ्यांना कोणाचीच हरकत नाही. किमान त्यामुळे उमेदवार व त्याचे समर्थक बघायला तरी मिळतात, असे त्यांना वाटते. विदर्भात मोठय़ा नेत्यांच्या सभा आयोजित केल्या जात असताना घरोघरी निवडणुकीचे वातावरण रंगू लागले आहे. विदर्भातील विविध जिल्ह्य़ात राजकीय वातावरण तापत असताना समर्थक ऑक्टोबर हीटची पर्वा न करता आपापल्या उमेदवारांसाठी मेहनत घेत आहेत. कुठलाही कार्यक्रम, समारंभ असो की कोणाचे निधन झाले असो, अशा ठिकाणी येणारे लोक आता केवळ निवडणुकीवर बोलू लागले आहेत. कोणाच्या किती जागा येतील, कोण उमेदवार निवडून येऊ शकतो, कुठल्या उमेदवाराने आतापर्यंत किती कामे केली या विषयावर चर्चा रंगू लागल्या आहे.
 विविध शासकीय, खाजगी कार्यालयासह बाजारपेठामध्ये विषयावर चर्चा  रंगू लागल्या आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध स्टार प्रचारकांच्या सभांना होणारी गर्दी, त्यांच्या भाषणातील काही वक्तव्यावर आणि विविध मुद्यांवर घरांमध्येही चर्चा होऊ लागल्या आहेत. काँग्रेसच्या पदयात्रेत किंवा गल्लोगल्ली घेण्यात येणाऱ्या छोटेखानी सभांमध्ये फारशी न होणारी गर्दी सध्या मतदारांमध्ये त्याबाबतही चांगलीच चर्चा आहे. निवडणुकीच्या काळात हमखास दिसणारे विविध राजकीय पक्षांशी संबंधित असलेले अभिनेते फारसे अजूनपर्यंत येथे प्रचारासाठी आलेले नाहीत. नागपूरसह विदर्भात कोणाला कुठे व कसे ‘मताधिक्य’ मिळेल याचेही अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत.