कोकणातील मच्छीमारांच्या मासळीला मुंबईच्या ससुन डॉक बंदरात योग्य दर मिळत नसून, वजन काटय़ातही जादा मासळी वजन केली जात असल्याची तक्रार येथील मच्छीमारांनी केली असून, आपल्या मासळीला घाऊक दरात विक्रीचा योग्य दर व काटय़ातील दुरुस्ती करावी या मागणीसाठी शनिवारी मच्छीमारांनी ससुन डॉक बंद आंदोलन केले होते. तरीही याची दखल न घेतल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या शेकडो मच्छीमार बोटी परत आणण्यात येत असून, योग्य दर व काटय़ातील फरक यासाठीचे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा फटका मात्र ग्राहकांना बसणार आहे.
अनेक संकटांवर मात करीत व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नसल्याने अनेकदा त्यांना आंदोलने पुकारावी लागली आहेत. कोकणात मच्छीमारी व्यवसायावर जगणारी ४० हजारापेक्षा अधिक कुटुंब आहेत. सध्याच्या मच्छीमारी व्यवसायाच्या धोरणानुसार प्रत्यक्ष मच्छीमारी करणाऱ्या खलाशांना त्यांचा वाटा मिळतो त्यामुळे ते अधिकाधिक कष्ट करून मासळी पकडतात. मात्र मासळी पकडल्यानंतर ती या मच्छीमारांसाठी मासळी विक्री केंद्र म्हणून उपलब्ध असलेल्या एकमेव ससून डॉकमध्ये विक्रीसाठी घेऊन जावी लागते. या ठिकाणी मासळीची वर्गवारी करून तिचा दर ठरविला जातो. त्यामुळे अनेकदा कष्ट करूनही अपेक्षेपेक्षा कमी दर मिळतो, याचाही फटका मच्छीमारांना बसत आहे. मासे खरेदी करणारे इतर बाजारांपेक्षा येथील मच्छीमारांना कमी दर देत असल्याने नुकसान सहन करावे लागत आहे. त्याच प्रमाणे एकदा मासळी उतरविली की ती भरणे कठीण, तसेच ससून डॉकशिवाय जवळ कोणताच दुसरा घाऊक बाजार नसल्याने मच्छीमारांना नाइलाजाने ससुन डॉकमध्ये कमी दरात मासळीची विक्री करावी लागते. दुसरीकडे ज्या दलालांकडून ही मासळी खरेदी केली जाते. त्यांच्या काटय़ातील वजनात फरक असल्यानेही वजनाचाही घाटा मच्छीमारांनाच सहन करावा लागत असल्याचे मत करंजा येथील मच्छीमार सीताराम नाखवा यांनी दिली आहे. तसेच मासेमारीसाठी पाठविण्यात आलेल्या बोटीही परत बोलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.