भारतीय विश्वविद्यालय संघाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अन्वेषण’ या संशोधन प्रकल्पांच्या पश्चिम विभागीय स्पर्धेमधून पुणे विद्यापीठाच्या पाच प्रकल्पांची राष्ट्रीय पातळीवरील अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
पश्चिम विभागामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि राजस्थानमधील विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये राजस्थान आणि गोव्यातून एकाही विद्यापीठाने सहभाग घेतला नव्हता. गुजरातमधील ८ विद्यापीठांमधून १६ प्रकल्पांची मांडणी करण्यात आली होती, तर महाराष्ट्रातून १७ विद्यापीठांमधून ७५ असे एकूण ९१ प्रकल्प मांडण्यात आले होते. यांमधून १७ प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. शेती, मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, आरोग्य विज्ञान, सामाजिक शास्त्र अशा पाच विषयांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रत्येक विभागात पुणे विद्यापीठातील एक प्रकल्प अंतिम फेरीसाठी निवडण्यात आला आहे.
स्पर्धेची अंतिम फेरी २२ ते २४ मार्च या कालावधीमध्ये मुंबईतील टाटा इन्स्टिटय़ूटमध्ये होणार असून अंतिम फेरीसाठी देशभरातील विविध विभागांमधून ७५ प्रकल्प मांडण्यात येणार आहेत.