शहराबाहेरचा बाह्यवळण रस्ता पूर्ण झाला. आता या रस्त्याचे चौपदरीकरण येत्या अडीच वर्षांत करण्याचे नवे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी संगमनेरकरांना दिले. बाह्यवळण मार्गाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याचे मत त्यांनी नोंदविले.
बहुप्रतीक्षित व चर्चित बाह्यवळण मार्गाचे उद्घाटनाचे सोपस्कर आज एकदाचे भुजबळ यांच्या हस्ते उरकले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार डॉ. सुधीर तांबे व अपूर्व हिरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, थोरात कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे, नगराध्यक्ष दिलीप पुंड, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप िशदे, तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, बांधकाम विभागाच्या अखत्यारित राज्यातील अडीच लाख किलोमीटरचे रस्ते येतात. या रस्त्याची कामे करताना अनंत अडचणी येतात. शासनाकडे पुरेसा निधी नसल्याने अनेक कामे खासगीकरणातून करावी लागतात. त्यातून प्रवासाचा वेळ व इंधन बचत होते. म्हणून टोल देण्याचा मार्ग निवडण्यात आला. मात्र या धोरणावर टीका केली जाते, असे सांगत त्यांनी टोलचे समर्थनच केले. नगर जिल्ह्यात पर्यटन खात्याची २४ कोटी तर बांधकाम खात्याची १७५ कोटींची रस्त्याची कामे चालू आहेत. याशिवाय ६८ कोटी रुपयांच्या विविध इमारतींची बांधकामे प्रगतिपथावर आहेत. खा. वाकचौरे विरोधी पक्षाची भूमिका चांगल्याप्रकारे निभावतात. मात्र कोल्हार ते सावळेविहीर रस्त्याचे ४४ कोटींचे व सावळेविहीर ते सिन्नर रस्त्याचे ४० कोटींचे काम बांधकाम विभागामार्फत सुरू असल्याची त्यांना माहितीच नसल्याचा टोला भुजबळ यांनी लगावला. पुणे-नाशिक मार्गावरील बाकी असलेल्या राजगुरुनगर ते सिन्नर या १३५ किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे काम येत्या ३० महिन्यांत पूर्ण केले जाईल असे नवे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
महसूलमंत्री थोरात म्हणाले, की बाह्यवळण रस्ता हा संगमनेरच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. तत्कालीन केंद्रीयमंत्री टी. बालू, कमलनाथ, सी. पी. जोशी यांच्याकडे आपण वारंवार पाठपुरावा केला. याकामी अनेकांची मदत झाली. त्यात भुजबळांचाही समावेश आहे. या वेळी डॉ. तांबे यांचेही भाषण झाले.
 सर्व काही श्रेयासाठी!
निळवंडे धरण, बाह्यवळण रस्ता अशा मोठय़ा कामांचे श्रेय मिळावे यासाठी उत्तरेतल्या अनेक नेत्यांची नेहमीच धडपड सुरू असते. आजच्या कामातही त्याची प्रचिती आली. थोरात यांनी रस्त्यासाठी आपण केंद्रात वेळोवेळी पाठपुरावा केल्याचे सांगितले. त्यावर खासदार वाकचौरे यांनी यात आपलाही खारीचा वाटा असल्याचे नमूद केले. शासकीय कार्यक्रम म्हणून आपण उपस्थित राहिलो, यात कोणी राजकारण करू नये. निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटनाची घाई केल्याचे सांगत तळे राखील तो पाणी चाखील असेही येथली स्थिती असल्याचे ते म्हणाले. याशिवाय खेड ते सिन्नर रस्त्याचे चौपदरीकरण आणि पुणे नाशिक लोहमार्गालाही मंजुरीसाठी आपण प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.