कोंबडय़ा भरून नेणारा टेम्पो लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. सर्फराज अशरफ शेख (३०), झहीर अशरफ शेख (२६), विकास ऊर्फ माकडय़ा पितांबरी मोटे (१९), अमित शामराव कदम (२४) अशी या चार जणांची नावे असून हे सर्व बदलापूरमधील रमेशवाडी येथील राहणारे आहेत. त्यांचे अन्य दोन साथीदार फरार  आहेत. स्थानक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मोहम्मद इम्तियाज गुलाम मोहम्मद शेख (३८) हा चालक १९ ऑक्टोबरच्या रात्री दोनच्या सुमारास कोंबडय़ांनी भरलेला टेम्पो घेऊन अहमदनगर-कल्याण महामार्गावरून मुंबईच्या दिशेने निघाला होता. माळशेज घाटाच्या पायथ्याशी मुरबाडच्या बाजूकडे अनोळखी इसमांनी ओमनी गाडीने हा टेम्पो अडवून चालकास दोन क्लिनरसह मारहाण करत बाहेर खेचले. त्यांच्याजवळील रोख रक्कम, मोबाइल फोन आणि माल भरलेला टेम्पो असा एकूण ३ लाख ७ हजार ५०० रुपयांचे माल घेऊन फरार झाले. तिघांनाही बदलापूरमध्ये सोडून ते फरार झाले. याप्रकरणी टोकावडे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने तपासाअंती चौघांना त्यांच्या ओमनी गाडीसह अटक केली.