तालुक्याच्या मुख्यालयस्थळी असणाऱ्या पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलीस वसाहत, ग्रामीण रुग्णालय आदी इमारतींची देखभालीअभावी दुर्दशा झाली असून सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याचा परिणाम कर्मचारी तसेच रहिवाशांना भोगावा लागत आहे.
ग्रामीण रुग्णालयात आधीच असुविधा आहेत, त्यात आता पुरुष तसेच स्त्रिया अशा दोन्ही वॉर्डामधून पाणी गळत असल्याने रुग्णांची कुचंबणा होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णालय प्रशासन सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रारी करीत आहे. मात्र तरीही कोणताही प्रतिसाद नाही. या पाणीगळतीपासून पंचायत समिती कार्यालयातील विविध कागदपत्रे वाचविताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ४२ वर्षांच्या या इमारतीची दुर्दशा झाली असून कर्मचाऱ्यांना अक्षरश: छत्री घेऊन काम करावे लागत आहे.
शासकीय इमारतींच्या या दुर्दशेबाबत वाडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपविभाग, विभागीय कार्यालय-जव्हार यांच्याकडे वारंवारी तक्रारी केल्या, तरीही त्यांची आजवर दखल घेतली गेली नसल्याचे वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल धुम आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी सांगितले.