भारतीय व्यवस्थापन संस्थेत (आयआयएम) शैक्षणिक वर्ष २०१५-१६पासून प्रवेश प्रक्रिया राबवण्यास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय (एमएचआरडी) आणि महाराष्ट्र शासनाने हिरवी झेंडी दाखवला असून यावर्षी ६० जागांसाठी मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडिजसाठी (एमएमएस) प्रवेश करण्यात येणार आहेत. तूर्त नागपूर आयआयएमसाठी मिहानमधील दहेगावच्या जागेवर केंद्राने शिक्कामोर्तब केले आहे. केंद्रीय तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव अमरजित सिन्हा यांनी अहमदाबादच्या आयआयएमचे संचालक आशिष नंदा यांना पत्र पाठवून या वर्षीपासून प्रवेश प्रक्रिया राबवण्याविषयी कळवले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नागपुरातील आयआयएमची घोषणा केली. विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (व्हीएनआयटी) परिसरात आयआयएमच्या आस्थापनेचे काम सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत येणाऱ्या मिहानमधील २९३ एकर जागा ताबडतोब देऊ केली. नागपूरच्या आयआयएमसाठी मिहानमधील २९३ एकर जागा मुख्यमंत्र्यांनी गेल्याच वर्षी देऊ केली. आयआयएमच्या तात्पुरत्या कॅम्पससाठी विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील (व्हीएनआयटी) ६ हजार ११६ चौरस मीटर जागा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिली आहे.
या संदर्भात सहसंचालक गुलाबराव ठाकरे म्हणाले, पदव्युत्तर व्यवस्थापन विषयाच्या जागा सामाईक प्रवेश परीक्षा (कॅट) द्वारे भरल्या जातात. त्याचप्रमाणे आयआयएमच्या जागाही कॅटमधूनच भरल्या जातील. अद्याप कॅटचा निकाल लागायचा आहे. नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या एमबीए संस्थांमध्ये आयआयएमचा समावेश केल्यानंतर विद्यार्थ्यांना संस्थेची निवड करताना हाही पर्याय उपलब्ध राहील. व्हीएनआयटीमध्ये संस्था चालवण्यासाठी तीन वर्षांची मान्यता देण्यात आली असून तोपर्यंत मिहान येथील जागेवर आयआयएमसाठी इमारत आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्यास गती मिळू शकेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.