होळी उत्सव हा देशभरात मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येत असलेला उत्सव असला तरी रायगड व कोकण विभागात होळीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथील गावा गावातून होळीच्या आगमनासाठी आठवडय़ापूर्वीच तयारी करण्याची प्रथा आहे. मात्र सध्या निमशहरीकरण झाल्याने हा उत्सव काही तासांपुरताच शिल्लक राहिला असून गावातील सार्वजनिक होळी लावण्यासाठी गावातील प्रत्येक घरातून सरपण, घरातील लाकूड मागण्याची प्रथा होती,त्यानुसार गावात ढोल,ताशा तसेच रिकामे पत्र्याचे व प्लास्टिकचे डब्बे वाजवत िधगाणा करीत शिमग्यात काही बोलण्याचा अधिकार प्राप्त झाल्याने आयनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना,यो घर बांधला माझ्या जिवावर, या घराचा पोकळ वासा अशी गाणी म्हणत आरोळ्या ठोकण्याची प्रथाही आता थांबली आहे. यामुळे तरुण व युवकांचा जो उत्साह होता तोही आता कमी झाल्याचे चित्र आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गात औद्योगिकीकरणाचा अभाव असल्याने आजही यापकी अनेक प्रथा सुरू आहेत. मात्र रायगड व विशेषत: उरण परिसरात या प्रथाही बंद पडू लागल्या आहेत. होळीच्या सणात या परिसरात लहानापासून ते वयस्कांपर्यंत आटय़ापाटय़ांचा खेळ रंगायचा, आठवडाभर हा खेळ झाल्यानंतर होळीच्या दिवशी स्पर्धा भरविण्याचीही प्रथा होती. मात्र जागेच्या तसेच वेळेच्या अभावी हे खेळही होत नाहीत. गावात होळी निमित्ताने वेगवेगळ्या प्रथा असल्या तरी त्या वाढत्या नागरीकरण व औद्योगिकीकरणामुळे बंद पडू लागल्या आहेत.