सूर्यनमस्कार हा योगधिष्ठीत व्यायाम प्रकार ही भारतीय संस्कृतीने मानव जातीला दिलेली अनमोल देणगी असून त्यामुळे व्यक्तीमत्त्वाचा शारिरीक, मानसिक  आणि बौद्धीक अशा सर्वागीण पातळीवर विकास होत असतो. हा उद्देश ठेवूनच स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सकाळच्या गुलाबी थंडीत शहरातील विविध भागातील  लाखो शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महिलांनी एकाचवेळी सूर्याला साक्षी ठेवत मंत्राचा उच्चार करीत बारा सूर्यनस्कार घालून स्वामी विवेकानंदाना आदरांजली अर्पण केली.
स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समिती आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शहरातील विविध भागात सूर्यनमस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. यशवंत स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी ब्रम्हास्थानंद, महापौर अनिल सोले, रवींद्र जोशी, आमदार नागो गाणार, नगरसेविका सफलता आंबटकर आदी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
नव्या भारत निर्माणासाठी स्वामी विवेकानंदाचे विचार आत्मसात करण्याची गरज असून विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने आचरण करा असे आवाहन स्वामी ब्रम्हास्थानंद यांनी केले.
महापौर अनिल सोले यांचे यावेळी भाषण झाले. चिटणीस पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमाला विलास काळे, स्थायी समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी, माजी महापौर अर्चना डेहनकर, विजय मुनीश्वर उपस्थित होते.
शहरात रेशीमबाग मैदान, भावानी माता मंदिर पारडी, विनायकराव देशमुख लकडगंज, रामनगर मैदान, के.टी मैदान, काटोल रोड, गिट्टीखदान, बालाजी नगर मैदान मानेवाडा चौक, एमएसईबी मैदान मवीन सुभेदार ले आऊट, मंगळवारी सदर उद्यान सदर, महर्षी दयानंद नगर मैदान, शांतीनगर कॉलनी उद्यान, स्नेहनगर मैदान वर्धा रोड, विद्या विहार कॉलनी प्रतापनगर, सुर्वेनगर मैदान, सेवासदन हायस्कूल आणि चिटणीस पार्कमध्ये सूर्यमनस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या परिसरातील शाळेतील हजारो विद्यार्थी आणि परिसरातील नाागरिक सहभागी झाले होते.