सहा महिन्यांच्या हुलकावणीनंतर कोलशेतच्या वायुदल केंद्रात बिबटय़ाच्या एका अडीच वर्षांच्या मादीस जेरबंद करण्यात वनखात्यास यश आले असून या मादीचे आता ‘ज्युली’ असे प्राथमिक नामकरण करण्यात आले आहे. या मादीला आता नेमके कोणत्या मुलुखात सोडण्यात येणार याबाबत वनविभागाने कमालीची गुप्तता बागळली आहे. असे असले तरी शहापूर येथील जंगल परिसरात ‘ज्युली’ला सोडण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे, दुसऱ्या मुलुखात सोडण्यात आलेला बिबटय़ा पुन्हा आपल्या मुलुखात येऊ शकतो, असे आजवरच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे, असे वन्यजीव जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे घोडबंदर परिसरात ‘ज्युली’ परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्पष्ट होते.
नॅशनल टायगर कन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅथॉरिटीच्या निकषानुसार बिबटय़ाचे वर्तन (आक्रमक किंवा सौम्य) पाहून त्याचे स्थलांतर करण्यात येते. या निकषानुसार, ज्युली फार आक्रमक नसल्याने तिचे सुमारे दीडशे ते दोनशे किमी अंतरावर स्थलांतर करण्यात आले असावे, असे मत ‘मुंबईकर फॉर संजय गांधी नॅशनल पार्क’ संस्थेचे सुनेत्र गोशाल यांनी व्यक्त केले आहे. स्थलांतरानंतरही बिबटे आपल्या मुलुखात परतत असल्याने स्थलांतर हा कायमस्वरूपी पर्याय ठरू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, ज्या मुलुखातील बिबटय़ाला जेरबंद करण्यात आले आहे, त्या मुलुखातील अन्य बिबटे आक्रमक होऊ शकतात. तसेच बिबटय़ाचे दुसऱ्या मुलुखात स्थलांतरण करण्यात आले तरी त्या मुलुखातील बिबटे त्याच्यावर हल्ला करू शकतात. त्यामळे त्या मुलुखातील बिबटय़ांसोबत त्यांना जुळवून घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच बिबटे एकमेकांचे शत्रू असतात, त्यामुळे आपआपसातल्या संघर्षांमुळेही त्यांचा मृत्यू ओढवू शकतो, असे आतापर्यंत बिबटय़ांवर झालेल्या संशोधनावरून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती गोशाल यांनी दिली. ठाण्यातील कोलशेत परिसर ‘ज्युली’चा मुलूख असून तिची याच परिसरात भटकंती सुरू होती. त्यातूनच तिचे दर्शन नागरिकांना होऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांनी तिला पकडण्यासाठी वनविभागावर दबाब वाढविला होता. यातूनच वनविभागाने या परिसरात पिंजरे लावून सापळे रचले होते. वायू दल केंद्र परिसरातील एका बंद कंपनीत लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी दुपारी ‘ज्युली’ जेरबंद झाली.
ज्युलीच्या स्थलांतरविषयी गोपनीयता
ठाणे शहरापासून सुमारे दोनशे किमी अंतरावर असलेल्या जिल्ह्य़ातील वनविभागाच्या हद्दीत तिचे स्थलांतर करण्यात आले असून तेथून ती पुन्हा कोलशेत परिसरात परतण्याची शक्यता कमी आहे. तसेच तिची प्रकृती ठीक असल्याने ती नव्या मुलुखात जुळवून घेईल, अशी माहिती वनविभागाचे साहाय्यक वनसंरक्षक सुधीर पडवळे यांनी वृत्तान्तशी बोलताना सांगितले. तिच्या शरीरात चिप बसविण्यात आली असून ती पुन्हा कोलशेत परिसरात आली तरी तिची माहिती मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.