ऑक्टोबरच्या उन्हाच्या झळा ऑगस्टमध्येच बसण्याची वेळ सध्या मुंबईकरांवर आली आहे. दोन-तीन दिवस संततधार लागून संपूर्ण शहराचा व्यवहार ठप्प करणाऱ्या पावसाची मुंबईकरांना सवय. पण आताशा एखादी सरही समाधान देऊन जात आहे. मुंबईकरांना जाणवणारे हे वास्तव हवामान खात्याच्या नोंदींमधूनही समोर येत आहे. जूनमध्ये सर्वाधिक पावसाचे सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या पावसाने जुल आणि ऑगस्टमध्ये नीचांक गाठून वेगळे विक्रम करण्याचे ठरवले आहे.
देशाच्या इतर भागांतील उणीव थोडीफार भरून काढणाऱ्या पावसाने राज्याकडे मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. त्यात मुंबईसारखा अतिपावसाचा प्रदेशही सुटलेला नाही. एकाच दिवसात शंभर मिमीहून अधिक पाऊस नोंदवण्याची सवय असलेल्या हवामान खात्याच्या पर्जन्यजलमापकात एक मिमीची पातळी ओलांडण्याएवढेही थेंब जमा होत नाहीत. ऑगस्टमध्ये किमान दहा दिवस ही परिस्थिती होती. आताही अवघे चार दिवस शिल्लक असताना ऑगस्टमधील पावसाचे प्रमाण अवघे ११८.५ अंश से. झाले आहे. ऑगस्टमधील पावसाची सरासरी ५३० मिमी आहे. म्हणजे सरासरीपेक्षा अवघा २२ टक्के  पाऊस झाला आहे. गेल्या साठ वर्षांत १९७२ या वर्षांचा अपवाद वगळता कोणताही ऑगस्ट महिना एवढा कोरडा गेलेला नाही. त्यातही गेल्या वीस वर्षांत फक्त १९९९ मध्ये ऑगस्टमध्ये पावसापेक्षा उन्हाचा ताप अधिक झाला होता.
जुलमध्येही पावसाने ओढ दिली. खरे तर हा महिना सर्वाधिक पावसाचा. या महिन्यात मुंबईत सरासरी ८०० मिमी पाऊस पडतो. देशातील निम्म्याहून अधिक ठिकाणी एवढा पाऊस वर्षभरातही पडत नाही. मात्र या वेळी मुंबईला या पावसाची उणीव भासली. जुलमध्ये अवघा ३५९ मिमी पाऊस पडला. म्हणजे या सरासरीच्या निम्म्याहून कमी. याआधी फक्त दोनच वेळा यापेक्षा कमी पावसाच्या जुलत ही नोंद झाली आहे. जूनमधील सर्वाधिक पावसाच्या विक्रमासोबतच जुल आणि ऑगस्टमधील नीचांकही या वर्षांच्या नावावर जमा होण्याची चिन्हे आहेत.