आधुनिक तंत्रज्ञानामुळे नव्या पिढीचा संगणकीय शिक्षणाकडे कल वाढला असला, तरी केवळ ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था हे हवेत मनोरे उभारण्यासारखे असून श्रम व ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थाच टिकाऊ असते. यासाठी गरीब आणि श्रीमंतांमधील वाढत चाललेली दरी कमी करून समानता आणणे आवश्यक असल्याने शिक्षकांनी मुलांमध्ये शिक्षणाबरोबरच शिस्त, शेतीविषयक बांधिलकी निर्माण केली तरच देशाचे महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे मत विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी व्यक्त केले.
बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकदिनी १९ शिक्षकांना जिल्हा पुरस्कार देऊन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या वेळी डॉ. दांगट म्हणाले, शिक्षकदिन हा गौरवाबरोबरच आत्मचिंतन करण्याचा दिवस असून सुरुवातीला शिक्षक आणि शिक्षण हे समजून घेतले पाहिजे. व्यक्तीच्या ज्ञानात, दृष्टिकोनात, वर्तणुकीत बदल घडविण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण. ही जबाबदारी शिक्षक पार पाडत असल्याने लोकशाहीत जिवंतपणा ठेवण्याचे व चारित्र्यसंपन्न पिढी घडवण्याचे काम शिक्षकांकडूनच होते. प्रास्तविक प्राथमिकचे शिक्षणाधिकारी शशिकांत िहगोणेकर यांनी केले.