माणसात एवढे सामथ्र्य आहे की, देवही त्याला गुरू मानतात, याची उदाहरणे आहेत. दगडातून माणूसपण, देवपण निर्माण करण्याची ताकद असलेला माणूस मात्र,अलीकडे स्वत:च दगड बनत चालला आहे. तो केवळ पोटासाठी जगत असल्याची खंत व्यक्त करताना, सात्त्विक जीवनासाठी माणसांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असून, ती ताकद कीर्तन, प्रवचनात असल्याचे राष्ट्रसंत उदयसिंह देशमुख ऊर्फ भय्यूजी महाराज यांनी सांगितले. दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येथील ‘चौफेर’ संस्थेच्या पुढाकाराने अखिल भारतीय कीर्तन कुल आयोजित चौथ्या अखिल भारतीय कीर्तन संमेलनास कृष्णा, कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर दिमाखात प्रारंभ झाला; त्या प्रसंगी ते बोलत होते. कीर्तन कुलाचे कुलश्रेष्ठ अच्युतानंद सरस्वती महाराज, स्वागताध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, कार्याध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी, आनंद जोशी, मोरेश्वर जोशी उपस्थित होते. भय्युजी महाराज म्हणाले की, आज अर्थकारणावर आधारित शिक्षणामुळे माणूस अस्तित्वहीन होत आहे, तरी मूल्याधिष्ठित शिक्षणाची नितांत गरज आहे. माणसाचा जन्म स्वत:च्या अस्तित्वासाठी झालाय. परंतु, भौतिक युगात खरा भक्तिभाव हरवत असल्याने मूल्यांची विषमता निर्माण होत आहे. आयुष्यात सुख, समाधान निर्माण करायचे असेल तर खरे शिक्षण आणि जीवन चंदनासारखे असावे ही रचना निर्माण झाली पाहिजे. कीर्तन आणि दर्शन झाले तर हे शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. माणसाने समाधान कशात हे समजून घेतले पाहिजे. त्यासाठी भक्ती, श्रध्दा आणि आदर्श अंगी बाळगणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अर्थकारणावर आधारित समाजरचना हे एक मोठे आव्हान असून, जातीपातीवर आधारित राजनीती हे आपले दुर्दैव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. संत शक्तीने कालचा गुन्हेगार आजचा महात्मा होतो. भयमुक्त मन:स्थिती हे कीर्तनाचे उद्दिष्ट असून, सामाजिक अस्तित्व कसे असावे हे जाणून घेण्याचे कीर्तन हे माध्यम असल्याचे भय्यू महाराज यांनी सांगितले. अच्युतानंद सरस्वती महाराज म्हणाले की, कीर्तनकार हा समाजाला प्रेरणा देणारा असून, कीर्तन परंपरा जागती ठेवण्यासाठी अशी संमेलने होत आहेत. अलीकडे काही कीर्तनकार अभ्यासाशिवाय समाजासमोर उभे राहतात. हे चुकीचे असून, अभ्यास केल्याशिवाय कीर्तनकारांनी व्यासपीठावर उभे राहू नये असे आवाहन त्यांनी केले. चंद्रकांत पाटील म्हणाले,‘पारतंत्र्याच्या काळात कीर्तनकारांनी मोठी भूमिका बजावली. त्याचे अस्तित्व आजही टिकून आहे.’