साहित्य आणि कलाक्षेत्रातील अनेक नामवंत बाबा आमटे यांच्या आनंदवनाशी जुळलेले असताना चित्रकलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या बसोलीने चित्राच्या माध्यमातून नाते जोडले आहे. हे नाते अधिक घट्ट होऊन प्रेम करावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी केले.
ज्येष्ठ समाजसेवक दिवं.बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून बसोलीच्या ७५ बालचित्रकारांनी बाबा आमटे यांच्या ‘ज्वाला आणि फुले’ या काव्यसंग्रहातील निवडक दीर्घ कवितांवर आधारित रंगरेषेच्या माध्यमातून अभिव्यक्ती सादर केली. या अभिव्यक्ती प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या काव्यसंग्रहातील बाबा आमटे यांच्या कविता समजायला कठीण असल्याचे बोलले जात असले तसे नाही. बाबांची कविता समजायला सोपी असल्यामुळे बसोलीच्या बालकलावंतांनी त्यावर चित्रे रेखाटली आहेत. बाबा आमटे आनंदवनात असतानासाहित्य आणि कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर आनंदवनाशी जुळले. पु.ल. देशपांडे नेहमीच आनंदवनात बाबांच्या सहवासात राहत, अशी आठवण त्यांनी सांगितली. बसोलीचे दीड लाखावर सदस्य हे कौतुकास्पद आहे. आनंदवनशी गेल्या अनेक वर्षांत ३० लाखावर माणसे जोडली गेली आहेत. त्यामुळे बसोलीसारखा आनंदवन हा एक परिवार आहे. आनंदवन आणि बसोली या कलेवर प्रेम करणाऱ्या संस्था असल्यामुळे बसोलीच्या सदस्यांनी आनंदवनाला भेट द्यावी, असे आवाहन डॉ. आमटे यांनी केले. चंद्रकात चन्न्ो यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. बसोलीची बालसदस्य कस्तुरी भाकरे दीपप्रज्वलन केले.
फॅबर कॅसल यांच्या सहयोगाने एक दिवसीय कॅनव्हास चित्र कार्यशाळेचे प्रारंभी आयोजन आल्यानंतर त्या कार्यशाळेत अभिव्यक्त झालेले ७५ बसोलीच्या बालचित्रकारांची सर्व कविता चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली. बाबांच्या दीर्घ कविता संग्रहातील ज्या ज्या कविता बालकांना भावल्या त्यावर बसोलीच्या बालकलाकारांनी आपली अभिव्यक्ती सादर केलीे. तसे पाहता बालवयाला बाबांच्या कविता समजायला कठीण आहेत, हा मोठय़ांचा समज मुलांनी चक्क चुकीचा ठरविला आहे. कॅनव्हासवरील बेफाम रंग, रेषा, आकार, कधी वास्तविक तर कधी अमूर्त वाटणारे, परंतु बालमनाची सहजप्रवृत्ती जपणारी ही चित्रे बसोलीच्या आजवरच्या बालचित्र प्रक्रियेत भर टाकणारे आहे. पंखांना क्षितीज नसते, एकलव्य, वसुंधरेचा पुत्र, विश्ववित्र सांगाडय़ाचे शहर यासारख्या बाबांच्या कविता आपल्याच कल्पनेतून साकार करूनकॅनव्हासवर चितारण्याचे काम बालकचित्रकारांनी केले आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन राहणार असून ४ ते ८.३० या वेळेत रसिकांना ते बघता येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन समीर हेजीब यांनी केले.