प्रलंबित मागण्यांसाठी तालुका भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच असून आंदोलनामुळे शेतकरी तसेच मालमत्ताधारकांची गैरसोय झाली आहे. आंदोलनास चार दिवस झाले आहेत.
प्रशासकीय पातळीवर नेहमीच या खात्यावर अन्याय होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. भूमी अभिलेख खात्यातील कामे तांत्रिक स्वरुपाची असल्याने तांत्रिक स्वरुपाचे वेतन मिळावे, संचालकांनी वेळोवेळी काढलेली अनावश्यक अवाजवी निराधार परिपत्रके कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण वाढविणारी असल्याने ती कमी करावी, नवीन भरती व नियम रद्द करून यापूर्वी सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक अर्हताधारक म्हणून समजण्यात यावे, भूकंपमापक तसेच नियमित दौरा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना २४०० रूपये प्रवास भत्ता त्यांच्या वेतनात देण्यात यावा, कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हांतर्गत करण्यात याव्यात, कर्मचाऱ्यांना गैरसोयीच्या प्रतिनियुक्ती देण्यात येऊ नये तसेच प्रतिनियुक्त भत्ता देण्यात यावा आदी मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.