शहरात रोडरोमिओ व टवाळखोरांचा वाढलेला उपद्रव, महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना, या पाश्र्वभूमीवर नवापूरकरांनी २२ एप्रिल रोजी काढलेला मूक मोर्चा आणि पोलीस निरीक्षक वसंत मोरे यांची बदली करण्याची मागणी प्रशासनाने बेदखल केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी आयोजित ‘नवापूर बंद’ शांततेत पार पडला. शहरातील व्यवसाय व बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या.
काही महिन्यांपासून शहरात काही समाजविघातक प्रवृत्तींचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रवृत्तीला आळा घालण्यात पोलिसांना पूर्णपणे अपयश आले आहे. कारवाई करण्याऐवजी पोलीस निरीक्षक वसंत मोरे हे तक्रारदाराचीच उलटतपासणी घेत त्यास अनावश्यक सल्ले देत असतात. त्यामुळे मोरे यांची बदली करण्यात यावी, या मागणीसाठी २२ एप्रिल रोजी सर्वपक्षीयांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गुंजळ व तहसीलदार आर. एम. पवार यांना निवेदन देऊनही या गंभीर बाबीची दखल घेण्यात आली नाही.  शहरात १९ एप्रिल रोजी छेडछाडीच्या घटनेनंतर दोन गटांमध्ये संघर्षांची स्थिती निर्माण झाली असतानाही पोलिसांकडून कारवाईस दिरंगाई झाली होती. असेच प्रकार यापूर्वीही घडले असतानाही प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या भावनेची दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे शुक्रवारी शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद होते. या वेळी आयोजित बैठकीस शंकर दर्जी, मौलाना रऊफ मणियार, प्रा. नवल पाटील, दीपक जयस्वाल आदी उपस्थित होते.