नवी मुंबई महापालिकेच्या पावसाळी पाण्याचे व्यवस्थापन प्रणालीची केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने विशेष दखल घेतल्याने महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
केंद्रीय नगर विकास मंत्रालयच्या वतीने नवी दिल्ली येथे २६ जून रोजी अमृत अर्थात अटल परिवर्तन आणि शहरी परिवर्तन मिशन तसेच स्मार्ट सिटी मिशन या योजनांचा शुभारंभ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नवी मुंबई महापालिकेच्या पावसाळी पाण्याचे व्यस्थापन प्रणालीची माहिती विशेष स्टॉलद्वारे प्रसारित करण्याचा बहुमान पालिकेस मिळाला. नवी मुंबई महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका शहर अंभियता मोहन डगांवकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या विशेष माहितीपर स्टॉलची निर्मिती केली असून दोन दिवसांमध्ये संपूर्ण देशभरातून आलेल्या विविध शासकीय निमशासकीय संस्था, प्राधिकरण यांच्या हजारो पदाधिकारी अधिकारी आणि जिज्ञासू नागरिकांनी या स्टॉलला भेट दिली.पावसाळी पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन राबविल्याबद्दल नवी मुंबई महापालिकेस केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय नागरी जल पुरस्कारने यापूर्वीच सन्मानित करण्यात आले आहे.  पावसाळी पाण्याचे व्यस्थापन या अनुकरणीय कार्यप्रणालीची माहिती सर्वानाच व्हावी या दृष्टीने अमृत आणि स्मार्ट सिटी मिशन योजनेच्या शुभारंभप्रसंगी देशाच्या राजधानीत नवी दिल्ली येथे या कार्यप्रणालीचा माहितीपर स्टॉल मांडण्याचा बहुमान नवी मुंबई महापालिकेस देण्यात आला होता.
या सादरीकरणामुळे महापालिकेच्या वैशिष्टय़पूर्ण कामांची दखल आणखी एकवार राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे.