सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्य़ात १ लाख १ हजार ७०३ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यासाठी ३ कोटी ५८ लाख ८२ हजार ७८७ रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, निम्मे शैक्षणिक वर्ष संपत आले, तरी केवळ ८५ हजार ५५९ विद्यार्थ्यांनाच शालेय गणवेश वाटप झाले. अजूनही १६ हजार १४४ विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत.या अभियानांतर्गत हिंगोली, सेनगाव, वसमत, कळमनुरी व औंढा नागनाथ या पाच तालुक्यांतील ४० हजार २७० मुले व ६१ हजार ४३३ मुलींचा समावेश आहे.प्रत्येकी दोन याप्रमाणे गणवेश वाटप करायचे होते. यासाठी ३ कोटी ५८ लाख ८२ हजार ७८७ रुपये प्राप्त झाले.
हा निधी विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात पंचायत समितीमार्फत शाळांना पाठविण्यात आला. परंतु जिल्ह्य़ातील ७६ गावांमध्ये शिक्षण व्यवस्थापन समित्यांची स्थापनाच झाली नसल्याने त्या-त्या गावातील विद्यार्थी, तसेच ज्या गावात शिक्षण समित्यांच्या निमित्ताने वाद चालू आहेत, अशा गावांतील शाळेचे विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचित आहेत.