कोपरगाव शहरात खराब रस्ते व स्वच्छतेअभावी धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने शहरातून फिरणे मुश्किल झाले आहे. शहर धूळ व धूरमुक्त व्हावे म्हणून विरोधी पक्ष जनविकास आघाडीने सोमवारी नागरिकांना हजारो मास्क मोफत वाटून गांधीगिरी पद्धतीने निषेध केला.
नगरपालिकेत सत्ताबदल होऊन एक वर्ष या आठवडय़ात पूर्ण होत आहे. सध्या नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. संपलेल्या वर्षभरात नगरपालिकेकडून एकही भरीव काम झाले नाही. पाणीटंचाईला शहर सतत तोंड देत आहे. शहरातील सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे खराब रस्ते व माती मिश्रीत खड्डय़ांमुळे संपूर्ण शहर धुळीच्या व त्यात निर्माण होणाऱ्या वाहनांच्या विषारी धुरामुळे बेजार झाले आहेत. शहरातील नागरिकांना श्वसनाचे विकार मोठय़ा प्रमाणात होत आहेत. लहान मुलांनाही कायमची सर्दी, फुफ्फुसाचे विकार होताना दिसत असून
संपूर्ण शहराचेच आरोग्य बिघडले आहे. नगरपालिकेकडून होणारे सर्व विकासकामे ठप्प असल्याने ही नगरपालिकाच आयसीयूत गेली की काय, अशा प्रतिक्रिया जनविकास आघाडीचे नगरसेवक, नेते यांनी दिल्या आहे.
झोपेचे सोंग घेतलेल्या व समोर शहराचे बिघडलेले स्वास्थ्य पाहूनही शांतपणे कारभार हाकणाऱ्या नगरपालिकेला जाग आणण्यासाठी व शहर धूरमुक्त करण्यासाठी रस्ते सुधारण्याची सद्बुद्धी मिळावी म्हणून जनविकास आघाडी शिवक्षेत्र कार्यकर्त्यांनी आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, डॉ. अजय गर्जे, नगरसेवक पुरब कुदळे, भरत मोरे, योगेश बागूल, अतुल काळे, माजी नगराध्यक्ष अनिल जाधव, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष श्रीरंग चांदगुडे आदींनी हजारो नागरिकांना मोफत मास्क लावून अनोखी गांधीगिरी केली.