राजकीय पक्षांची कायमस्वरूपी जी कार्यालये आहेत, त्या ठिकाणी पक्षाचा नामफलक वा नेत्यांचे छायाचित्र लावण्यावर कोणतेही र्निबध नसल्याचे निवडणूक आयोगाने सूचित केले असले तरी काही राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचा चांगलाच धसका घेतल्याचे पाहावयास मिळत आहे. काँँग्रेस, राष्ट्रवादीने पक्ष कार्यालयातील नामफलक व राजकीय नेत्यांचे छायाचित्र ‘जैसे थे’ ठेवले आहे. शिवसेनेने स्वागताचा फलक कायम ठेवला तर भाजपने कार्यालयावर पक्षाचा झेंडा फडकत राहील याची दक्षता घेतली. हा निकष बहुधा ज्ञात असल्याने राज्यात व केंद्रात सत्तेत असणाऱ्या राजकीय पक्षांनी या माध्यमातून जनतेसमोर झळकण्याची संधी साधली. दुसरीकडे मनसेने आपल्या कार्यालयाबाहेरील नामफलक व नेत्यांची छायाचित्रे बंदिस्त करून टाकली आहेत. आचारसंहितेचे पालन करण्यावरून काही राजकीय पक्षांमध्ये संभ्रम असल्याचे लक्षात येते. दरम्यान, जिल्’ाातील १५ मतदारसंघात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन झाले नसल्याचे आचारसंहिता कक्षाचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर यंत्रणेने सार्वजनिक ठिकाणी असणारे राजकीय पक्षांचे फलक, बॅनर, झेंडे व तत्सम साहित्य काढण्यास युद्धपातळीवर सुरुवात केली. अनेक ठिकाणी राजकीय पक्ष, पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने असे फलक हटविले. महिनोन्महिने प्रमुख रस्ते व चौकात राजकीय फलकांचे दाटणारे मळभ सध्या दूर झाले असले तरी राजकीय पक्षांच्या कार्यालयांसाठी आचारसंहिता लागू होते की नाही, याबद्दल संभ्रम आहे. शहरातील या पक्षांच्या कार्यालयावर फेरफटका मारल्यास ही बाब ठळकपणे दिसून येते. बहुतांश प्रमुख राजकीय पक्षांची जिल्हा कार्यालये नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघात येतात. त्र्यंबक रस्त्यावरील मनसेच्या कार्यालयाबाहेरील पक्षाचा नामफलक व नेत्यांची छायाचित्रे कापडाने झाकून ठेवण्यात आली आहेत. ‘राजगड’ केवळ इतकीच ओळख या ठिकाणी दिसते. आचारसंहितेच्या उल्लंघनाची नसती आफत नको म्हणून ही कृती केली गेल्याचे लक्षात येते.
महात्मा गांधी रस्त्यावर काँग्रेसचे शहर व जिल्हा कार्यालय आहे. या पक्षाकडे निवडणूक लढविण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. यामुळे त्यांना आचारसंहिता उल्लंघन कधी व कशी होते याची पुरेपूर जाण असावी. कारण, पक्षाच्या प्रवेशद्वाराबाहेर नेत्यांचे छायाचित्र असणारा फलक दिमाखात उभा आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीचे मुंबई-आग्रा महामार्गावरील अलिशान भवनमध्येही यापेक्षा वेगळी चित्र नाही. या पक्षाच्या नेत्यांची छायाचित्रे महामार्ग व सव्‍‌र्हिस रस्त्यांवरून मार्गस्थ होणाऱ्यांना दृष्टिपथास पडतात. एन. डी. पटेल रस्त्यावरील भाजपच्या कार्यालयात पक्षचिन्हाचा झेंडा फडकत आहे, तर शिवसेनेच्या शालिमार चौकातील कार्यालयात युवा नेत्यांच्या स्वागताचे फलक झळकत आहे. तुलनेत नवख्या असलेल्या मनसेने आचारसंहितेचा धसका घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्’ाातील १५ विधानसभा मतदारसंघात कुठेही तिचे उल्लंघन झालेले नाही. आतापर्यंत त्या स्वरूपाच्या कोणी लेखी तक्रारीही केलेल्या नसल्याचे जिल्हा आचारसंहिता कक्षाकडून सांगण्यात आले.

पक्षांच्या कायमस्वरूपी कार्यालयास र्निबध नाही
राजकीय पक्षांच्या कायमस्वरूपी कार्यालयात पक्षाचे नांव, चिन्ह वा झेंडा तत्सम साहित्य लावण्यास निवडणूक आयोगाने र्निबध घातलेले नाहीत. तात्पुरत्या स्वरूपात जी कार्यालये प्रचारासाठी उभारली जातात, त्या ठिकाणी त्या त्या मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे राजकीय पक्षांना क्रमप्राप्त ठरणार आहे. कायमस्वरूपी कार्यालयात असे फलक वा पक्षचिन्हाचा झेंडा असल्यास आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही.
-गणेश राठोड
(तहसीलदार तथा साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक मध्य)