उत्सवाआडून कुरघोडय़ांना ऊत
दहीहंडी उत्सव जल्लोषातच साजरा करणार अशी भूमिका घेत ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी एकीकडे वैद्यकीय शिक्षणमंत्री जीतेंद्र आव्हाड यांच्या ‘सुरात सूर’ मिसळण्यास सुरुवात केली असताना दुसरीकडे विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठोकल्याने दहीहंडीच्या निमित्ताने ठाण्यातील अजब राजकारणाच्या गजब तऱ्हा पाहायला मिळत आहेत. दहीहंडी उत्सवाविषयी ठाण्यातील शिवसेनेची भूमिका स्पष्ट होण्यापूर्वीच आमदार सरनाईक यांनी सोमवारी या उत्सवातील झगमगाटाला आवर घालण्याचे जाहीर केल्याने आपसूकच प्रसिद्धीचा झोत त्यांच्याकडे वळला आणि शिवसेनेत मतभेदांची हंडी उभी राहिली. निर्णयाची हंडी आधीच फुटल्याने मंगळवारी यासंबंधी पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याच्या तयारीत असणारे शिवसेनेचे ठाण्यातील सर्वेसर्वा एकनाथ िशदे यांची मोठी कोंडी झाली. त्यामुळे काहीसे खट्टू झालेल्या एकनाथरावांनी मंगळवारी ‘जल्लोषा’चा नारा देत सरनाईकांना एकाकी पाडल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करत या सगळ्या वादात आतापर्यंत एकाकी पडलेल्या आव्हाडांना मात्र शिवसेनेच्या भूमिकेमुळे मोठा आधार मिळाला असताना तेथे शिवसेनेत आडोशाला सारले गेलेल्या सरनाईकांच्या पाठीवर डावखरेंनी कौतुकाची थाप देत ‘मैं हूना’चा राग आवळल्याने दहीहंडी उत्सवाच्या आडून ठाण्यात सहमतीच्या राजकारणाचे अनोखे प्रदर्शन घडू लागले आहे.
ठाण्यातील दहीहंडी उत्सवाआडून होणाऱ्या राजकारणाचे ओंगळवाणे प्रदर्शन कधीच लपून राहिलेले नाही. संस्कृती आणि संघर्षांच्या बाता मारत एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी या उत्सवांचा येथील राजकीय नेते कसा वापर करतात हेदेखील ठाणेकरांनी अनुभवले आहे. दहीहंडी उत्सवात आवाजाची पातळी ओलांडणाऱ्या मंडळांच्या मुसक्या बांधण्यासाठी ठाणे पोलिसांनी मोर्चेबांधणी करताच येथील राजकीय वर्तुळात गहजब उडाला. तेव्हापासून आतापर्यंत सुरू झालेल्या वादात सरस ठरण्याची नवी स्पर्धा येथील राजकीय नेत्यांमध्ये सुरू झाली असून उत्सवाच्या आडून समन्वयाच्या नव्या राजकारणाचे वारे पुन्हा एकदा शहरात वाहू लागले आहेत.

कुणाला कुणाचा आधार..
ध्वनिवर्धकाच्या आवाजापासून सुरू झालेल्या या वादात पहिल्या दिवसापासून येथील राजकीय वर्तुळात जीतेंद्र आव्हाड एकाकी पडल्याचे चित्र आहे. उत्सवादरम्यान होणारा दणदणाट आणि सरावादरम्यान बाल गोंविदांचे होणारे मृत्यू यामुळे दहीहंडी उत्सवांचे आयोजन वादात सापडले आहे. असे असताना यंदाच्या वर्षी साधेपणाने हंडी साजरी करण्याची घोषणा करत सरनाईक यांनी या वादात सुरेख टायमिंग साधले. मात्र, सरनाईकांनी अचूक साधलेली वेळ ठाणे शिवसेनेत अनेकांना पचनी पडली नसून मंगळवारी पक्षाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरनाईक अनुपस्थित राहिल्याने शिवसेनेत मतभेदांची हंडी उभी राहिल्याची चर्चा रंगली आहे. एकनाथ िशदे यांनी ‘जल्लोष आणि आवाजा’चे समर्थन केल्याने िशदे आणि आव्हाड यांच्यात छुपी युती रंगल्याची चर्चा आहे. स्वत: िशदे यांनी मात्र याचा जाहीरपणे इन्कार केला आहे. दरम्यान, शिवसेना नेते आव्हाडांच्या सुरात सूर मिसळू लागले असताना दुसरीकडे वसंत डावखरे यांनी सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे जाहीर कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाण्यातील राष्ट्रवादीचे एक नेते जीतेंद्र आव्हाड न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत असताना साधेपणाने उत्सव साजरा करणाऱ्या सरनाईकांचे कौतुक करत डावखरे यांनी आव्हाडांना धोबीपछाड दिल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात डावखरे यांनी मात्र आपला तसा हेतू नसल्याचे स्पष्ट केले असून ‘कुणी कसा उत्सव साजरा करायचा हा ज्याचा-त्याचा प्रश्न असल्याचे म्हटले आहे.’