धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा मंजूर नियोजित आराखडा डावलून वळण रस्ता बिडकीनजवळून नेण्याच्या विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या सूचनांमुळे या प्रकल्पात नोकरशाही खोडा घालत असल्याचे भाजपचे मत बनले आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्याकडे या अनुषंगाने मंजुरीस दिलेली संचिका धूळखात आहे. नव्या सूचनांमुळे हा मार्ग २५ किलोमीटरने वाढेल. परिणामी त्याचा उपयोग होणार नाही. अधिकाऱ्यांच्या नव्या सूचनांमुळे प्रकल्प रखडेल, अशी भीती भाजपचे बसवराज मंगरुळे यांनी व्यक्त केली.
या महामार्गाचा औरंगाबादकरांना मोठा उपयोग होणार आहे. हा मार्ग होताना तयार होणाऱ्या वळण रस्त्याचे आरेखन तत्कालीन विभागीय आयुक्त भास्कर मुंढे व जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांच्यासमवेत बठकीत मंजूर केले होते. १० जून २०११ रोजी झालेल्या बठकीतील चच्रेनुसार पालकमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी राष्ट्रीय महामार्गाच्या आरेखनास मंजुरी दिली. नंतर गेल्या महिन्यात अचानक विभागीय आयुक्तांनी हा रस्ता काही वर्षांतच शहरातील रस्त्याचा भाग बनेल असे सांगत तो बिडकीनकडून वळविण्यात यावा, अशा सूचना केल्या. परंतु त्यामुळे खर्चही वाढेल आणि पुन्हा मंजुरीसाठी ताटकळत बसावे लागणार असल्याचा आरोप मंगरुळे यांनी केला. काहीजणांच्या सांगण्यावरून नोकरशाहीने मार्ग बदलण्याचा घाट घातल्याचेही मंगरुळे म्हणाले. तथापि, कोणत्या व्यक्तीमुळे हा प्रकल्प रखडला हे सांगण्यास नकार देताना रस्त्याच्या कामात कोणीतरी झारीतील शुक्राचार्य असल्याचा उल्लेख मात्र पत्रकार बठकीत वारंवार केला.