जिल्हय़ातील पारंपरिक पीकउत्पादन इतर जिल्हय़ांच्या तुलनेत कमी आहे. ते वाढविण्यासाठी त्यातील त्रुटी काढून योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे, असे मत औरंगाबाद विभागाचे कृषिपालक संचालक पी. एन. पोकळे यांनी व्यक्त केले.
कृषी व पणन विभागाच्या कृषी हवामान विभागनिहाय अभ्यासगटाचे चर्चासत्र, तसेच शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन येथे केले होते. त्याचे उद्घाटन पोकळे यांच्या उपस्थितीत झाले. कृषी सहसंचालक शु. रा. सरदार, उपसंचालक संतोष आबसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. जी. मुळे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक पी. एम. चांदवडे आदी उपस्थित होते. विभागातील हवामानानुसार पीकपद्धती, पिकांच्या जाती, लागवडपद्धती, पीकउत्पादनासाठी वापरावयाचे तंत्रज्ञान वेगवेगळे असून, आपल्या विभागासाठी कोणत्या यंत्राचा अवलंब करावा, यासाठी हे चर्चासत्र महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन शेती केल्यास शेती उत्पादनातील घट भरून निघण्यास मदत होईल, असे पोकळे यांनी सांगितले. कार्यक्रमास जिल्हय़ातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.