तप्त उन्हाळा असो, धुवाधार पाऊस की गारठवून टाकणारी थंडी. ऋतू कोणताही असला तरी त्यांच्या शिवभक्तीच्या प्रेमाला ओहोटी कधीच येत नाही. वीरमरण आलेल्या वीर शिवा काशिद यांच्या समाधीचे पूजन, शिवरायांच्या कर्तृत्वाला मुजरा, मराठेशाहीतील ऐतिहासिक घटनांना उजाळा असा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या १३ तारखेला किल्ले पन्हाळगडावर पार पडतो. प्रसिद्धिपराङमुख राहून के. एन. पाटील व संदीप जंगम हे दोन शिवभक्त गेली पाच वर्षे हा उपक्रम अथकपणे राबवीत आहेत. उद्या शनिवारी पन्हाळगडावरील वीर शिवा काशिद स्मारक लोकार्पण होत असताना या दोघा शिवभक्तांचे कार्य वेगळेपण अधोरेखित करणारे आहे.     
पन्हाळा किल्ल्यासंदर्भातील अनेक ऐतिहासिक घटना मराठेशाहीच्या इतिहासात संस्मरणीय ठरल्या आहेत. पन्हाळय़ाला सिद्धी जोहरचा वेढा पडला असताना छत्रपती शिवाजीमहाराजांनी पन्हाळय़ावरून विशाळगडाकडे केलेली कूच आणि या लढाईवेळी वीर बाजीप्रभू व वीर शिवा काशिद यांना आलेले वीरमरण या घटना महत्त्वपूर्ण आहेत. पन्हाळगड चढताना बुधवार पेठ ओलांडली की काही अंतरावर वीर शिवा काशिद यांची समाधी आहे. आता ही समाधी सुशोभित केली आहे. मात्र या जागी आजचे चित्र नसतानाही दोन शिवभक्त मात्र प्रत्येक महिन्याच्या १३ तारखेला पन्हाळय़ाला येतात. हीच तारीख त्यांना आलेल्या वीरमरणाचा स्मृतिदिन म्हणून स्मरण करतात. केखले गावचे के. एन. पाटील म्हणजे शिवभक्तीने भारावलेले व्यक्तिमत्त्व होय. शेकडो शिवभक्तांसह ते पन्हाळय़ावर येतात. शिवस्तुतिपर गीत गातात. शिवप्रभूंचा जयघोष करतात आणि पुढील महिन्यात जमण्यासाठी विदा होतात. कोणत्याही वाद, राजकारण, संघटना यात सहभागी न होता ते छत्रपती शिवराय अभियान सातत्याने राबवत आहेत. संघटनेला अध्यक्ष, उपाध्यक्ष वा कसलेही पद नाही. अर्थार्जन, अर्थसंग्रह नाही. आहे तो फक्त निखळ शिवभक्तीचा कार्यक्रम.     
या उपक्रमाविषयी के. एन. पाटील सांगतात, एखाद्या गोष्टीचा इतका लळा लागावा की त्याचेच नेहमी स्मरण राहावे. वारकरी जसा पंधरवडय़ाची एकादशी करतो, वर्षांतून एकदा वारी करतो तद्वत प्रत्येक शिवभक्ताने रायगडाला भेट देऊन छत्रपतींच्या विचारात मग्न राहिले पाहिजे. आजवर के. एन. पाटील शेकडो वेळा रायगडाला गेले असून त्यांच्याबरोबर पहिल्यांदा रायगड पाहणाऱ्यांची संख्या हजारात आहे.     वीर शिवा काशिद पुण्यतिथीच्या निमित्ताने कागल तालुक्यातील नाभिक समाजातील काही तरुण १३ तारीख ही तिथी मानून प्रत्येक महिन्याच्या १३ तारखेस नेबापुरातील वीर शिवा काशिद समाधीजवळ एकत्रित जमतात. समाधीचे पूजन करतात. शिवरायांचा जयघोष करतात. शिवा काशिद यांच्या स्मृतींना उजाळा देतात. तथापि, या तरुणांना मध्यंतरी या उपक्रमात सातत्य राखता आले नाही. ही गोष्ट के. एन. पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांचे एक निष्ठावंत सहकारी संदीप जंगम यांनी हा उपक्रम बंद होऊ द्यायचा नाही असा निश्चय केला. गेली पाच वर्षे प्रत्येक महिन्याच्या १३ तारखेला वीर शिवा काशिद यांच्या समाधीचे पूजन ते करतात. वीर शिवा काशिद स्मारक लोकार्पण सोहळा वाजत-गाजत होईल, पण नंतर पुढे काय असा प्रश्न उपस्थित होईल, तेव्हा के. एन. पाटील व संदीप जंगम हे दोन शिवभक्त नि:शब्दपणे करीत असलेले कार्य सुगंध पसरवत राहील.