छावा संघटनेच्या पाठपुराव्यामुळे कारेगाव शिवारातील दोन चाऱ्यांची दुरूस्ती करण्याचे काम जलसंपदा विभागाने हाती घेतले आहे. मात्र, या चाऱ्यांवर लाखो रूपये खर्च झाल्याचे दाखवून गैरव्यवहार दडपण्यात आल्याचे उघड झाले आहे. खरिप हंगामाच्या आवर्तन काळात पाटबंधारे खात्याचा चालू पाण्यात चाऱ्या तासण्याचा प्रकार छावा संघटनेने आंदोलनाच्या माध्यमातून जनतेसमोर आणला. या चाऱ्यांचे लाखो रूपये अखर्चित आहेत. याविषयी माहितीच्या अधिकारात छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी अर्ज करून चारी नं. ११ व चारी नं. १२ या चाऱ्यांची माहिती मागविली. त्यानंतर या चाऱ्या तात्पुरत्या स्वरूपात तपासून देण्याचे काम पाटबंधारे विभागाकडून चालू करण्यात आले. परंतु या कामाची माहिती देण्यास आजही टाळाटाळ होत आहे.
विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असून त्यामध्ये पाटबंधारे विभागाच्या भ्रष्टाचाराचा प्रश्न ऐरणीवर असताना पाटबंधारे विभागाला छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, गोवर्धन गोरे, मालुंजा ग्रामपंचायत सदस्य अच्यूत बडाख यांच्यासह कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी खरिप हंगामाच्या चालू आवर्तनात घेराव घातला होता. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे उपअभियंता शरद गडाख व वडाळा उपविभागाचे उपअभियंता एस. के. थोरात यांनी त्यावेळी समक्ष पाहणी करून या चाऱ्या तात्पुरत्या स्वरूपात तपासून देण्यास सुरूवात केली आहे. परंतु या चाऱ्यांवर लाखो रूपये खर्च दाखविण्यात आला आहे. त्याचे गूढ कायम आहे.