सरकारी कामाची अनास्था आपण नेहमीच पाहिली आहे. कामे होत नाहीत, वशिलेबाजी आणि सरकारी कार्यालयात अनेकदा मारावे लागणारे हेलपाटे यांनी आपण नेहमीच रडकुंडीला येतो. यंत्रणेला दोष देण्यापेक्षा परिसरातील समस्यांवर मात कशी करता येईल यांचे जिवंत उदाहरण ऐरोली सेक्टर ३ परिसरातील मानवतावादी एकता संघाने दाखवून दिले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या या संस्थेने शौचालय आणि सेक्टर तीन येथील राजीव गांधी उद्यानाची स्वत:च सफाई मोहीम हाती घेऊन एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. ऐरोली सेक्टर तीन परिसरातील राजीव गांधी उद्यानात नेहमीच नागरिकांची मोठय़ा संख्येने वर्दळ असते. आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवावा, असे आपण नेहमी ऐकतो. मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी आपण न करता सरकारी यंत्रणेला दोषी ठरवत असतो. मानवतावादी एकता संघाने ही संकल्पना मोडीत काढली आहे.