राज्य शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी सात अनुदान योजना राबविल्या जात असून यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी १३२ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. परंतु अनेक ज्येष्ठ नागरिकांना या योजनांची माहिती नसते. यामुळे विविध सवलती आणि अनुदानापासून ते वंचित राहातात. यामुळे समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने ८ ते ३० नाव्हेंबर याकालावधीत वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सामाजिक बांधिलकी अभियान’ राबविण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रभागात ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र शिबीर आणि राज्य शासनाच्या ‘श्रावणबाळ निवृत्ती वेतन’ योजनेसाठी गरुजूंना मदतीचा हात दिला जाणार आहे. ६५ वर्षांवरील आणि दारिद्र्य रेषखालील नागरिकांना शासनातर्फे देण्यात येणारे ४०० रुपये तसेच केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेद्वारे दिले जाणारे २०० रुपये असे एकूण ६०० रुपये मासिक निवृत्ती वेतन ‘श्रावणबाळ योजने’द्वारे मिळणार आहे. अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. १२ डिसेंबर रोजी शिबिरात नोंद केलेल्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क – ९७७३२८४४७४ / ९३२१२९५०६०