गतवर्षी ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘भांडा सौख्य भरे’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता त्याच धर्तीवर आधारीत थोडय़ा वेगळ्या प्रकारचा शो पुन्हा एकदा अवतरत आहे. या नवीन कार्यक्रमाचे नाव आहे ‘नांदा सौख्य भरे’. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद ओक करणार असून, नांदा सौख्य भरे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन सध्या उत्तम जीवन जगत असलेल्या कुटुंबातील मंडळींना भेटता येणार आहे. यामध्ये केवळ पती पत्नी यांचा समावेश नसून यात बहिण, भाऊ असे कुटुंबातील सर्व घटकांचा समावेश असणार आहे.
नातेसंबंधात आलेल्या आर्थिक आणि इतर अडचणी घरातील गृहिणी दूार करतात व त्यावर मात करतात, अशा अनेकांची उदाहरणे आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातुन पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाबद्दल बोलताना प्रसाद ओक म्हणाला, भांडा सौख्य भरे यामध्ये घरातील कलह यावर आम्ही नजर टाकली. आता नांदा सौख्य भरे या माध्यमातून परिस्थितीशी दोन हात करून लढलेल्या व्यक्तींना आपण भेटणार आहोत. त्यामुळे मलाही याबाबत खूपच उत्सुकता आहे. हा कार्यक्रम केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत न ठेवता तो आता भारतासह परदेशातही नेण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय आहे असेही मत त्याने व्यक्त केले.