पावसाने जवळपास महिनाभर दडी मारल्याने पाणी किती महत्त्वाचे आहे, याचा प्रत्यय सर्वाना नव्याने आला आहे. सकल जीवसृष्टीचा अविभाज्य घटक असणाऱ्या आणि म्हणूनच जीवन म्हटल्या जाणाऱ्या पाण्याची महती विशद करणारी ‘पाणी पाणी रे.. गोष्ट पाण्याची’ ही एक साहित्य, संगीताची दृक्श्राव्य मैफल ‘इंद्रधनु’ संस्थेच्या वतीने शनिवार, २६ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पाण्याची उत्पत्ती, पाण्याच्या साहाय्याने फुललेली संस्कृती, पाणी मिळविण्यासाठी मानवाने शतकानुशतके केलेली धडपड, पाण्याने झालेली पडझड, पाण्याचे चमत्कार, साहित्य-संगीतातून दिसणारे पाण्याचे आविष्कार, जल निरक्षरतेतून होणारी पाण्याची उधळपट्टी, प्रदूषणाने होणारे दुष्परिणाम या साऱ्याचा आढावा या मैफलीत घेतला जाणार आहे. कल्याणी साळुंके आणि धनंजय म्हसकर या मैफलीत गाणी सादर करणार असून अनंत जोशी संगीत संयोजन करणार आहेत. अमूल पंडित यांनी लिहिलेल्या संहितेचे त्यांच्यासह निकिता भागवत निवेदन करतील. या मैफलीदरम्यान मुंबई-ठाणे परिसरात जलसंवर्धनाबाबत केल्या जाणाऱ्या प्रयोगांची ओळखही करून दिली जाणार आहे.