कामानिमित्त शहरात आलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाला शिवाजी चौकातच भरधाव ट्रकने उडवले. सलग दुसऱ्या दिवशी अपघात होऊन एका तरुणाचा आणि सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला. या महामार्गावर १२ तासांत दोघांचा बळी गेला. सोमवारी झालेल्या या अपघातामुळे पाऊण तास वाहतूक ठप्प झाली होती.
 बीड शहरातून जाणारा सोलापूर-धुळे हा राज्य महामार्ग शहराला वळणरस्ता नसल्यामुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. जालना रस्ता ते बार्शी नाक्यापर्यंत सतत वाहतुकीची कोंडी होते. यामुळे अपघात नित्याचे झाले आहेत. आज सकाळी सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल गोपीनाथ सोनवणे (रा. खांबािलबा) हे आपली दुचाकी (एमएच २३ के २१४०)वरून शहरात आले होते. सव्वाअकराच्या सुमारास शिवाजी चौकातील सिग्नल तोडून पुढे जात असताना गेवराईकडून आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. सोनवणे हे ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी याच रस्त्यावर प्रशांत प्रभाकर पवार (वय २२) या तरुणाचा जालना रस्त्यावरून शाहूनगरकडे जात असताना धडक लागून मृत्यू झाला होता. बारा तासांत या रस्त्यावर दोन जणांचा बळी गेला आहे.