शिक्षणाचा अभाव, दारिद्रय़ आणि धर्माची चुकीची मांडणी यामधून दहशतवाद निर्माण होत असतो. समाजामध्ये अशा काही व्यक्ती असतात त्यांना शांतता अप्रिय असते आणि अशांतता स्वागतार्ह असते. त्यातूनच दहशतवाद बळावला जातो, असे प्रतिपादन अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले आहे.
ते इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आयोजित गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यंदाच्या ६ व्या वर्षी  अॅड. निकम यांनी ‘दहशतवाद आणि कायदा’ या विषयावर व्याख्यानमालेत आपले विचार परखडपणे मांडले.   
ते म्हणाले, गुन्हे करणारे हे दहशतवादीच असतात असे नाही तर लहान-मोठय़ा गुन्ह्यातूनच दहशतवादी निर्माण होत असतात. प्रत्येक गुन्ह्यामध्ये काहीतरी कारण असते. ते कारण काही वेळा जनतेच्या समोर येते तर काही वेळा येत नाही. त्यामुळे त्याला आपण तर्कशास्त्राचा आधार देत असतो. देशाचा दहशतवाद कसाबला फाशी देत असताना जी गोपनियता बाळगली गेली. त्याचे कारण म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्याला फासावर लटकविताना आम्ही दिवाळी साजरी करणे ही माणुसकी नाही. आपल्या संस्कृतीला कोठेतरी गालबोट लागत चालले आहे.
नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर, प्रकाश आवाडे, किशोरी आवाडे, रत्नप्रभा भागवत, नितीन देसाई यांच्यासह नगरसेवक आणि नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.