यमदूताला वाकुल्या दाखवून घरी परतलेल्या मिरजेतील ९२ वर्षांच्या आजीबाईंनी तब्बल ७२ तासांनी आपली इहलोकीची यात्रा आटोपली. जीवदान मिळालेल्या ७२ तासांत आजींनी नातेवाइकांचा दोनदा निरोप घेतला. शुक्रवारी रात्री त्यांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जीवनाच्या अंतिम प्रवासासाठी चौघांच्या खांद्यावरून गेलेल्या मिरजेतील ९२ वर्षांची आजी दैव बलवत्तर म्हणून यमदूतालाही वाकुल्या दाखवून स्मशानातून मंगळवारी रात्री घरी परतल्या होत्या.
मिरजेच्या वखार भागातील कोकणे गल्लीत राहणाऱ्या श्रीमती तानुबाई शंकर मोतुगडे (वय ९२) यांना वार्धक्याने अस्वस्थ वाटू लागल्याने सोमवारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मुलीची मुलगी स्वत डॉक्टर असल्याने तिच उपचार करीत होती. मात्र शरीर वैद्यकीय उपचाराला फारसा प्रतिसाद देत नव्हते. अंतिम क्षणी कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येत होता. मंगळवारी रात्री साडेसात वाजता आजीबाईंनी जीवनयात्रा संपविली असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिला होता.  
स्मशानभूमीत नेल्यानंतर खड्डय़ात फरशी बसविण्यासाठी काही कालावधीसाठी आजीबाईंना बाजूला ठेवले होते. या वेळी अंत्यविधीसाठी जमलेल्या लोकांच्या आजीबाई हालचाल करीत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे स्मशानभूमीतच पुन्हा डॉक्टरांकरवी आजीबाईंची प्रकृती तपासण्यात आली असता त्यांचा श्वासोच्छवास चालू असल्याचे लक्षात आले. त्यामुळे जाताना खांद्यावरून आणलेल्या आजीबाईंना पुन्हा चार चाकीतून घरी आणण्यात आले होते.
शुक्रवारी रात्री आजींची प्रकृती अधिकच खालावली होती. रात्री ८ वाजता आजींचा श्वास थांबला असल्याने मृत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर रात्री उशिरा मळ्यात त्यांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.