संतांचे विचारच देशाला तारणार असून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने संतांचे विचार अंगीकारणे गरजेचे आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.
कालभैरव जयंतीनिमित्त पारनेर येथील भैरवनाथ मंदिरात आयोजित करण्यात येत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या त्रितपपूर्ती सोहळयाचे उद्घाटन हजारे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय औटी होते. रामचंद्र महाराज कांबळे, पुंडलीक महाराज जंगलेशास्त्री, डॉ. नारायण महाराज जाधव, पारस महाराज मुथा, बाजार समितीचे सभापती काशीनाथ दाते, युवक नेते अनिकेत औटी, सरपंच अण्णासाहेब औटी, उपसरपंच नंदकुमार देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर भक्तीपंढरीच्या मोठया सोहळयाच्या आयोजनाबाबात आपणास साशंकता होती, मात्र भैरवनाथ सेवा मंडळाच्या उत्साही तरूणांनी सर्व संकटांवर मात करून हा सोहळा यशस्वी केल्याचे औटी यांनी यावेळी बोलताना सांगितले. सचिन महाराज शेटे यांनी भैरवनाथ सेवा मंडळाच्या वतीने सोहळयाविषयी विवेचन केले. नंदकुमार देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर विजय डोळ यांनी आभार मानले.